11 ले चा परिवार -

 

11 ले चा परिवार -                

                     आम्ही सहपरिवार कायम लेला रहात होतो. आर्मी आणि एअरफोर्सच्या लोकांना मात्र लडाखमधे सीमेवरील सुदूरच्या ठाण्यांवर कितीही महिने जाऊन रहायला लागे. अशावेळी त्यांच्या कुटुंबियांना लेला रहायची परवानगी असे पण खूप दूरच्या ठाण्यांवर जाऊन रहायची परवानगी नसे. त्यामुळे बहुतेक आर्मी ऑफिसर्स एकटं राहणंच पसंत करत. ह्याच कारणानी आमच घर अनेकांना हक्काचं घर वाटु लागलं. आणि आम्हालाही सगळे आमच्या परिवाराचे सदस्य! थोडी सवड मिळताच कितीकितीजण भेटून जात. त्यासाठी पूर्वसूचनाही  द्यावी लागत नसे. एकदा आमचे एक ब्रिगेडिअर मित्र आमच्याकडे आले. “आज पूर्ण रिलॅक्स होण्यासाठी आलो आहे.” त्यांनी सांगितलं.  “माझ्या हाताखालच्या एका सिनिअर कर्नलला सांगितलं माझं महत्त्वाचं काम आहे. मला वेळ लागेल; तर त्यालाही कुठेतरी त्याच्या महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. त्यालाही वेळ लागेल म्हणाला.” दुसर्‍या एका कर्नलवर युनिट सोपवून आलो आहे. ते बोलत असतांनाच दरवाजातून आर्मीची दुसरी गाडी अंगणात येऊन दाखल झाली. अचानक समोर ब्रिगेडिअरची गाडी पाहून काय करावं हे त्या कर्नलनाही कळेना. पण येणारी गाडी पाहून ब्रिगेडिअर महाशय खो खो हसत  मोठ्याने म्हणाले “ये ये सुभाष आपल्या दोघांचंही महत्त्वाचं काम इथेच आहे.” दोघंही लडाखच्या खूप दुर्गम भागात दोन महिने राहून आले होते. तिथे रस्ते बनविण्याचं काम सुरू करण्यापूर्वीचा तो सर्व्हे होता. कर्नल सुभाष साऊथ पोलला सहा महिने राहून आले होते. “वहिनी साऊथ पोलला सुद्धा लेपेक्षा खूपच चांगलं होतं. तिथे चोवीस तास वीज, बर्फावर धावणाऱया गाड्या - -! - -इथे नदीच्या पात्रातून गाडी नेतांना बर्फाच्या पाण्यात हात घालून दगड धोंडे दूर करता करता जीव जायची वेळ येते.” सूर्याच्या अल्ट्रा इफ्रा सैन्यानी त्यांचा जिवंत बार्बेक्यू करून कातडी सोलून काढली होती.  सारेच खळखळुन हसत होते. खूप सार्‍्या कामानंतर पावभाजीचा स्वाद घेणं हे किती महत्वाचं काम आहे हे मलाही पटलं आणि मी पावभाजीच्या तयारीला लागले. सुदैवाने आमच्या घराच्या समोरच नुकतीच बेकरी सुरू झाली होती. आणि किचन गार्डनमधे गार्डन फ्रेश कोबी, प्लॉवर, बटाटे, कांदे, कोथिंबीर तयारच होते.

                      तेंव्हा लडाखला सैन्याच्या दोन डिव्हिजन्स (Div.) होत्या. आमचं घर लेमधे भर बाजारातच असल्यानी सहपरिवार येणारे दोन्ही जनरल मोठ्या आपुलकीने भेटून गेल्याशिवाय रहात नसत. आत्तापर्यंत मोतीगल्लीचं माझं ज्ञान बरच वाढलं होतं. आणि वट पण! त्यामुळे फक्त आमच्याच नातेवाईकांनाच नव्हे तर आमच्या मित्रांच्या नातेवाईकांनाही ते उपयोगी पडत असे.

                        डाऊनला तुच्छ वाटणारं कोथिंबीर, पुदिना घातलेलं खास घरी बनवलेलं मसाला ताक ले च्या स्वर्गात अमृतासारखं परमोच्च मधुर पेय म्हणून मी सर्व सेलिब्रेटिंना देत असे आणि आलेले सर्वजण ‘तक्रं शक्रस्य दुर्लभम्’ (इंद्राला ताक दुर्लभ) असं म्हणून मोठ्या आनंदानी ते प्राशन करून तृप्त मनानी परत जात असत.                 

                          1971 ची लढाई लढून अनेक मेडल्स मिळवलेले एअरफोर्सचे वेल डेकोरेटेड ग्रुपकॅप्टन सरदेसाई तसेच सर्व जवानांची आणि ऑफिसर्सच्या तब्बेतीची आस्थेने काळजी घेणारे ले मधील आर्मी हॉस्पटलचे मुख्य डॉक्टर डॉ. तुताकनेही आमच्या परिवारात सामील झाले. चंडीगडहून आम्हाला पाठवलेल्या भाजीत कधी लिंबंही असत. मी लिंबाचं सरबत बनवलं तर “व्वा ! फ्रेश लेमन विथ बिया! क्या बात है!” असं त्यात राहून गेलेल्या बियांचंही स्वागत होत असे. हो म्हणजे फ्रेश लिंबू नसेल तर बिया कुठुन येणार? डॉक्टरांची लेहून बदली झाली तेंव्हा त्यांना एक दिवस गाडी घेऊन त्यांच्या जवळच्या कोणालाही भेटायची परवागी होती. तेंव्हा डॉक्टरसाहेब न विसरता पहिल्यांदा आम्हाला भेटून गेले. नंतर डॉक्टरसाहेब A.F. M. C. चे मुख्यही झाले.

           

                    सियाचन ही जीवघेणी खिंड लढवायला जाण्यापूर्वी आमचे आर्मीचे दोस्त आवर्जून फर्माईश करीत. “वहिनी एकदा झकास भाकरी आणि भरीत करु या! तुम्हाला येते ना भाकरी बनवायला?” समोरून आलेल्या प्रश्नाला मी “होऽऽऽ” म्हणून उत्तरही देऊन टाकलं. “पण भाकरीचं पीठ कोण आणणार? भरताची वांगी कशी मिळणार?” दुस र्‍याच क्षणी मी गडबडले. “त्याची काळजी नको. भारताच्या कुठल्या कोप र्‍यातून काय पाहिजे ते सांगा. आज विमान घेऊन जाणार आहे. येतांना तुम्ही सांगाल ते घेऊन येतो”. दुसरी कडून उत्तरही आलं आणि दुस र्‍याच दिवशी माझ्याकडे चार पाच किलो वांगी आणि भाकरीचं पीठही हजर झालं. भाकरी हा प्रकार आमच्या कुठच्याच कुकच्या गावी नव्हता. मला एकटीलाच भाकरखिंड लढवायची होती. संध्याकाळी सर्वांना आमंत्रणाचे खलितेही पोचले होते. आता माघारही शक्य नव्हती. वांग्याचं पोतं उघडलं तर ना मोठी ना छोटी भलतीच वांगी पुढ्यात होती. भरीत नाही तरी कशीबशी भाजी जमणार होती. पंधरा वीस जणं म्हणजे चाळीस तरी भाकर्‍या बनवायच्या फर्रऽऽऽ वाल्या स्टोवर! मला दुपारपासून भाक र्‍याच बदडायला लागणार तर!  भाकरी करता करता आठवलं - - -अरे! आपण तूप लोणी आणायला सांगितलंच नाही. अमूल बटरचा दगड टेबलावर ठेऊन कोण घेणार? आणि माझ्या डोक्यात कल्पना आली अत्ताच अमूल बटर वितळवून प्रत्येक भाकरीला लावून ठेवावं. नंतर जशा लागतील तशा भाकरी ओव्हनमधे गरम करत राहू. भाकरी थापता थापता आणि त्याला लोणी लावता लावता लहानपणी आई सांगायची त्या गोष्टीची आठवण झाली.  श्रावण महिनाभर आई विविध व्रत वैकल्यं करायची. पूजा करून झाली की आम्हाला कहाण्या ऐकायला बसवायची. कोण्या एका कहाणीत देशोधडीला लागलेल्या राजाच्या राणीला स्वप्न पडतं की पंगती जेवत आहेत, आणि ती चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहोत. तिला बाकी राण्या हसतात. पण राजा मात्र ते लक्षात ठेवतो व चांगले दिवस येताच तिची इच्छा पूर्ण करतो. लहानपणी ती राणी थोडीशी येडी वाटायची. आपण जेवायला बसलो आहोत आणि आपल्याला कोणी तूप वाढत आहे असं राणीला शोभेल असं स्वप्न पडलं तर ठीक आहे. आपण तूप वाढतोय हे कसलं स्वप्न!ऽऽऽ- - पण आज मात्र प्रत्येक भाकरीला अमूल बटर लावतांना मला तिचं स्वप्न उमगत होतं. - - - राणीलाच असं स्वप्न पडू शकतं. बघता बघता भाकर्‍यांचा गठ्ठा भल्यामोठ्या डब्यात स्थानापन्न झाला. हात दुखत होता तरी मज्जा आली होती. भरीत शक्य नाही; भरली वांगी करू असं ठरवलं होतं. आणि अचानक मी ताडकन उडाले. भाजीसाठी शेंगदाणे खोबरं किंवा कांदा टोमॅटो ह्याच्यातला कुठलाच पदार्थ माझ्याकडे नाही. पूजेत नसलेल्या पूजासाहित्याच्या नावानी अक्षता वहायची तरी सोय असते आता काय? तिखट मीठ बरोबर झालं की कुठलाही पदार्थ चांगलाच होतो असा आईचा उपदेश कामी आला. सगळे आले तेंव्हा मोठ्या पराक्रमी चेह र्‍यानी मी भाकरीचा डबा उघडला आणि हे काय! मी पातळ करून लावलेलं अमूल बटर एव्हाना घट्ट होऊन सर्व भाक र्‍या एकमेकांना चिकटून बसल्या होत्या. एवढा सलग गट्ठा ओव्हनमधेही मावणार नव्हता. छिन्नी आणि पटाशीचीच गरज पडणार होती. शेवटी त्यांचे जमतील तसे तुकडे काढून ते ओव्हनमधे गरम केले. पण त्यादिवशी माझी फिरकी घेत सगळ्यांनी मी बनवलेला भाकर तुकडा,  तुकडा-पाण्यासोबत आनंदानी संपवला. माझा दुखरा हात मी कधीच विसरून गेले होते. मला महिषासूरमर्दिनी स्तोत्रातल्या भूरिरिकुटुम्बिनि भूरिकृते अशा पार्वतीची आठवण होत होती. भूरि म्हणजे पुष्कळ, मोठा. जिचा परिवार खूप मोठा आहे (भूरिरिकुटुम्बिनि) आणि जिने परिवारासाठी खूप काही केलं आहे (भूरिकृता) अशी! आमच्या ह्या छोट्याशा परिवारासाठी कधीतरी थोडंसं काही करून मला इतका आनंद मिळत असेल तर त्या पार्वतीला - -अन्नपूर्णेला जगाला भरभरून देतांना किती आनंद होत असेल? खाण्यापेक्षा खिलवण्यात फारच गम्मत आहे.

              अशीच अनेक गोष्टींची फर्माईश होत रहायची. त्यांच्या आवडीचे थालिपीठ, साबुदाण्याची खिचडी, पावभाजी बनवायला फारच मजा येई. आणि सियाचनला जाणारे हे आर्मी आणि एअरफोर्सचे ऑफिसर जातांना निरोप घेतांना हात उंचावून म्हणून जात “बाय वहिनी! जगून वाचून परत आलो तर परत येईन खिचडी खायला!” सुदैवानी सारे जण परत येत गेले आणि पदार्थांची लज्जत वाढतच गेली. ह्या सर्व पदार्थांसोबत असलेली स्विटडिश मात्र कायमची ठरून गेली होती. - खरवस! अर्थात ही कृपा होती आमच्या अजुन एका परिवार सदस्याची कॅप्टन मुकुंद आणि पर्यायाने F.R.L ची.

-------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -