13 बाणासिंग –

 

13 बाणासिंग


            ज्याच्या पराक्रमाची गाथा ऐकून भल्या भल्या वीरांनीही आश्चर्यांने तोंडात बोटं घालावीत, ज्याची क्षात्रवृत्ती पाहून विजयश्रीनेही वरमाला घेऊन अधीरतेने उभं रहावं, पराक्रमाच्या शोधात फिरणा र्‍या शाहिरांच्या उदास झालेल्या लेखण्यांनाही ज्याच्या पराक्रमामुळे नवसंजीवनी मिळावी, ज्या कालभैरवाच्या शौर्यापुढे मरणानेही ओशाळं व्हाव, ज्याची कीर्ति-गाथा ऐकून सामान्यांच्या धमन्यांमधूनही रक्त सळसळायला लागावं, भारताला लाभलेल्या ज्या अमोघ ‘बाणा’पुढे सर्व शस्त्रांस्त्रांची तोंड लाजेनी काळवंडुन जावीत, ज्या झंजावाती तुफानापुढे हिमवादळांनीही मान तुकवावी, आणि ज्या निश्चयाच्या महामेरूसमोर सर्वांनी नतमस्तक व्हावं, अशा या बाणासिंगची कहाणीही तितकीच अद्भुत आणि रोमहर्षक आहे.  जगातील सर्वात उंच युद्धभूमी - -सियाचन ग्लेशिअरशी बाणासिंगचं नाव कायमचं जोडलं गेलं आहे. सियाचनची कहाणी बाणाशिवाय अपूर्णच राहून जाते.

                      आहे तरी कोण हा बाणासिंग? 26 जानेवारीला दरवर्षी दिल्लीला होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामधे, युद्धामधे गाजविलेल्या अतुलनीय पराक्रमासाठी मिळणारा परमोच्च पुरस्कार- - ‘परमवीरचक्र’ छातीवर मिरवीत सैन्याच्या उघड्या जीप मधून ताठ मानेने जाणारा हा ‘विजयी बाणा’ पाहिल्यावर आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की, ना उंची ना भरभक्कम शरीर! तगडेपणाचा लवभरही पंजाबी  वारसा लाभलेल्या ह्या छोट्याशा मूर्तीने हा पराक्रम केला तरी कसा? ‘मोटेसे डरना नहीं, पतलेसे लडना नहीं’ म्हणतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाणा! ‘मूर्ति लहान पण कीर्ति महान’ असा हा बाणा!

 ज्या रणभूमीवर ही गोष्ट घडली त्या रणभूमीबद्दल थोडसं जाणून घेऊ या. हा इतिहास ज्या ठिकाणी बाणासिंगानी घडवला ते ठिकाण आहे सियाचन ग्लेशिअर(Siachen). बाल्टी भाषेत सियाचनचा अर्थ आहे- ‘काळ्या गुलांबांची भूमी’. (land full of black roses) ध्रुवीय प्रदेशांव्यतिरिक्त असलेली सर्वात मोठी हिमनदी! जगातील सर्वात उंच रणभूमी! हिमालयाच्या काराकोरम पर्वत रांगांच्या पूर्वेकडील भागात भारत पाकिस्तान यांच्या Line of Control वर ही हिमनदी आहे. आज संपूर्ण सियाचन ग्लेशियर परिसरावर भारताचा ताबा आहे. पश्चिमेकडून साल्तोरो रिज (Saltoro Ridge)तर पूर्वेकडून काराकोरम रेंज ह्यांच्यामधे ही हिमनदी आहे. 76 किमि. लांब आणि 1 ते 2.5 कि.मि. रुंद असलेल्या ह्या ग्लेशियरची उंची ‘इंदिरा’ ह्या ठाण्यापाशी 18,875 फुटापासून ते त्याच्या शेवटच्या टोकापाशी  11,875 फूट आहे. हिवाळ्यात सरासरी 35 फूट बर्फ पडतं आणि तापमान उणे 30 ते उणे80 अंश सेंग्रे. पर्यंत खाली घसरतं. ह्या साल्तोरो रिजचं जे शिखर बाणासिंगनी काबीज केलं ते आहे समुद्रसपाटीपासून 22,143 फूट, म्हणजेच 6,749 मीटर उंचीवरील पाकिस्तानी पोस्ट कैद (Quaid)!  सिया-ला, बिलाफोंड-ला आणि ग्योंग-ला (Sia La, Bilafond La and Gyong La.) ह्या इथल्या तीन महत्वाच्या खिडी. इथपर्यंत पोचायचं म्हणजे अतीशय अवघड. अतीशय विरळ हवामान! जबरदस्त हिमपातात जमिनीच्या रुंद भेगा किंवा फटी म्हणजेच  (crevices)  बर्फानी बेमालुम झाकल्या  जातात. हत्तीला पकडण्यासाठी केलेल्या ‘खेड्यात’ - - -जमिनीत खणलेल्या मोठ्या खड्यावर गवत झाकून ठेवावं आणि ह्या ‘खेड्यात’ हत्तीने कळत पडावं तशा ह्या जीवघेण्या बर्फाच्छादित फटी कोणाला केव्हा पोटात घेतील हे काही सांगता येत नाही. त्यात1500 फुटाचा 90 अंशात उभा असलेला कडा चढून शत्रूच्या गोळ्या छातीवर झेलत वर चढून हे पोस्ट जिंकून घेणं म्हणजे महा भयंकर विषारी नागाच्या फण्यावरील मणी काढून आणून तो जिवंत सिंहाच्या नाकातल्या  केसात ओवून केलेल्या दागिन्याइतकं दुष्प्राप्यच म्हणावं लागेल.

                           पण तेही साहस करून दाखविलं बाणासिंगानी. भारतपाक सीमेनजिक जम्मूजवळ बासमती तांदुळांसाठी प्रसिद्ध असलेल्या RS Pura मधील कडयाल या छोट्याशा खेडेगावात जन्मलेला बाणासिंग 1969 मधे सैन्यात जवान म्हणून दाखल झाला. ह्या हरहुन्नरी जवानाने थोड्याच दिवसात कंपनी क्लार्क पासून ते क्वार्टर मास्टरच्या कामापर्यंत सर्व कामे सहज हाताळली. एवढंच नव्हे तर Warfare School in Gulmarg and Sonamarg येथे अतीशय उंच डोंगरांमधे होणा र्‍या युद्धाचं तंत्रही अवगत करून घेतलं. 20 एप्रिल 1987ला त्याच्या सर्व बटालियन सोबतच हा सर्वगुणसंप्पन्न तरुण सियाचनला दाखल झाला. जेंव्हा त्यांची बटालियन सियाचनला दाखल झाली तेंव्हा पाकिस्तानचे तेंव्हाचे लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुश्शर्रफ यांच्या आदेशाने पाकिस्तानी सैन्याने आधीच कैद हे ठाणं ताब्यात घेतलं होतं. पाकिस्तानच्या बाजूने तिथे पोचणं सोपही होतं.

               ह्या ठाण्याचं भारतीयांसाठी खास महत्त्व होतं. ह्या सर्वात उंच ठाण्यावरून 80 कि.मी. चा टापू नजरेच्या टप्प्यात येतो. संपूर्ण साल्तोरोची रेंज आणि त्यातील आपल्या ‘अमर’ आणि ‘सोनम’ ह्या ठाण्यांवरही बारीक नजर ठेवता येते. ह्या ठाण्यांना संपूर्ण रसद पुरविण्याचं काम फक्त हेलिकॉप्टर मार्फतच केलं जातं. पाकिस्तानने जर ही रसदच तोडली तर भारतीय सैन्यावर महाभयंकर आपत्ती येऊ शकते. आणि झालं ही तसंच! 18 एप्रिल1987ला कैद वरून केलेल्या गोळीबारात ‘सोनम’ या ठाण्यावरील आपले JCO सहित 5 सैनिक मृत्युमुखी पडले. त्यामुळेच आपल्या सैन्याच्या सुरक्षेसाठी आणि रसद पुरविणार्‍या आपल्या हेलिकॉप्टर्सच्या सुरक्षेसाठी हे पोस्ट काबीज करणं अत्यंत महत्त्वाचं होतं.

                    CO of 8 JAK LI ह्या बटालियनच्या कमांडिंग ऑफिसर (CO), Col. डि. एस्. रावत यांनी ह्या पोस्टवर असलेल्या पाकिस्तानी सैन्याची ताकद आजमवण्यासाठी एक गस्तीची तुकडी पाठवायचा निर्णय घेतला. आणि सेकंड लेप्टनंट राजीव पांडे ह्यांच्या नेतृत्वाखाली 29 मेला 10 जणांची गस्तीची तुकडी रवाना झाली. 1500 फूट उंचीचा  90 अंशात उभा असलेला सरळसोट, कधीही घात करणारा बर्फाचा कडा चढून जाण्यात या जवानांना यश तर आलं. पण निसर्गाने त्यांना साथ दिली नाही. वरती पोचताच तिथली हिमवादळं, अंधुक प्रकाश, ह्यात अजून भर म्हणजे ते दाहीजण पाकिस्तानी SSG commandos च्या दृष्टीला पडले आणि लेप्टनंट राजीवसहित दहाही जवानांना पाकिस्तानी सैन्याने तिथेच कंठस्नान घातलं. मरणोत्तर वीरचक्र देऊन भारतातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

                           राजीव आणि आपल्या दहा सोबत्यांना असं गमावल्याचं हलाहला सारखं आपलं दुःख कंठातच रोधून धरत, जराही हतोत्साह होता आता कैद ठाणं आपण जिंकायचच ह्या मोठ्या निर्धाराने कमांडिंग ऑफिसरने `Operation Rajiv' नावाची एक नवीन मोहीम आखली. ह्यात एकंदर 62 लोकांचा सहभाग होता. 23, 25 आणि 26 जून 1987 अशा तीन टप्प्यात ही मोहीम फत्ते करायचं ठरलं. कंपनी कमांडर वीरेंद्रसिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या तुकडीने त्या बर्फाच्या कड्यावर चढण्यासाठी दोर ठोकायचं काम तर केलं. पण झालेल्या प्रचंड हिमपातात ते दोर बर्फात कुठे लुप्त झाले ते कळलंच नाही. परत दोर ठोकण्यात आले पण दोन जवानांचा बळी घेत ही मोहिम इथेच थांबवावी लागली. 25 जून च्या दुस र्‍या मोहिमेत सुभेदार संसारसिंगांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या प्लाटुनला आता वर चढण्यासाठी दोराचं काही संकट नव्हतं. पण हेडक्वार्टरशी संर्पकच तुटल्याने त्यांनाही ही मोहीम अर्ध्यातच सोडून परत फिरावं लागलं.

                    कर्नल रावतांच्या निर्धारावर ह्याचा थोडासासुद्धा परिणाम झाला नाही. फांद्या तोडलेल्या वृक्षाला जसे अजून धुमारे फुटावे तसे कैद घेण्याचे नवनवे मनसुबे त्यांच्या डोक्यात घोळत होते. त्यांचा निर्धार अधिकाधिक पक्का होत होता. त्यांनी आपल्या जवानांसमोर केलेल्या भाषणात सांगितलं.- - - “ह्या मोहिमेत मी माझे किती मोहरे गमावतोय ह्याची मला पर्वा नाही.- - पण कैद वर भारताचा झेंडा फडकेलच! त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.” ह्या मोहिमेसाठी आपल्या एकेका हिर्‍यांना निवडायला त्यांनी सुरवात केली. नायब सुभेदार बाणासिंग, रायफलमॅन चुनिलाल, लक्ष्मणदास, ओमराज आणि काश्मिरचंद! 26 जून 1987 च्या दुपारी बरोबर बारा वाजून 11 मिनिटांनी आकाश ढगांनी झाकोळून गेलेलं असतांना, अंधार दाटून आला असतांना आणि महा भयानक हिमपाताला सुरवात झाली असतांना ऑपरेशन राजीवच्या शेवटच्या टप्याची सुरवात झाली. बाणासिंगच्या नेतृत्वाखाली सारचे सिंह शिकारीसाठी सज्ज झाले.

                         सर्वांच्या लाडक्या कंपनीकमांडर वीरेंद्रसिंग ज्याला ह्या मोहिमेच्या सुरवातीलाच छातीत गोळी लागून मरण पत्करावं लागलं त्यांनी मोहिमेच्या सुरवातीसच जेंव्हा सगळ्यांना सल्ला दिला की ‘शक्य असेल तर पाकिस्तानी जवानांना जिवंत कैद करा’ तेंव्हा त्वेषाने उसळून बाणा म्हणाला “सर मेरी मासी दे पुत्त थोरी ना हैगे?”(सर ही थोडीच माझ्या मावशीची मुलं आहेत? ) आणि तिथे पसरलेल्या भीषण शांततेचा भंग करीत वीरेंद्रच्या चेहर्‍यावरही हास्याची लकेर उमटली.

             विजयाची आशा धूसर करणार्‍या अभद्र लक्षणांनीच विजय मोहिमेची सुरवात झाली. आकाशात काळ्या ढगांनी दाटी केली. जोरदार हिमपाताला सुरवात झाली. भर दुपारी रात्रीसारखा काळोख पसरला.  ते कमी की काय म्हणून  शत्रूलाही आपल्या हालचालींचा काहीतरी सुगावा लागला होता. शत्रूचं लक्ष विचलित करण्यासाठी भारतीय तोफांनी आग ओकायला सुरवात केली. ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं लक्ष भलतीकडेच केंद्रित होणार होतं.  दोन बाजूंनी बर्फाच्या 1500 फुटाच्या अभेद्य सरळसोट कड्यांच्या भिंती असलेला कैद हा हिमनदीचा बालेकिल्ला अभेद्य आहे ह्याची बाणासिंग आणि इतरांना पूर्ण जाणीव होती. बाणा निघाला तो डोक्याला कफन बांधूनच! जगून वाचून परत आलोच तर कैद घेऊनच येईन नाहीतर - -नाहीतर हे कफन ओढून मरण पत्करेन. अग्नीला वाळवीचं कसलं भय! सूर्याला अंधाराची काय भीती! ह्या धीर पुरुषाला मरण काय भय दाखवणार?   जीवावर उदार होऊन बाणा निघाला.- - -देशासाठी तळहातावर शिर घेऊन निघाला. अगदी आपल्या ‘ताना’ सारखा! ‘आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं’ असं म्हणून कोंडाण्यावर चालून जाणा र्‍या तानासारखा! बाणाने सगळ्यात खडतर असलेला रस्ता घ्यायचा ठरवलं. ह्या बाजूने शत्रू वर येईल अशी थोडीसुद्धा कल्पना पाकिस्तानी सैनिकांना आली नाही. आणि त्याचवेळी निर्दय हिमवादळ सुरु झालं. वरून आकाशच फाटलं होतं. हिमपाताला खळ पडत नव्हता. दिवस आहे का रात्र असा अंधार पसरला होता. रक्तही गोठवून टाकणारं सोसाट्याचं वारं सुटलं. पण आपल्या तुकडीला धाडस देत वर चढण्यासाठी बाणासिंग प्रोत्साहन देत होता. थोड्याही चुका करता निसर्गालाही नमवून सारे जण 1500 फूटाचा कडा सर करून आता शत्रूच्या राज्यात येऊन पोचले. आता पूर्ण सावध राहणं आवश्यक होतं.

                      बाणासिंगला एवढं मात्र नक्की माहीत होतं की कैदवर एकच पण जमिनीच्या पोटात खोल असा बंकर आहे.  इतक्या खराब हवामानात शत्रू चाल करून येण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकही गाफील होते. भारताचे पहिले दोन प्रयत्न हाणून पाडल्यामुळे भारतीयांची पुन्हा इथवर यायची हिम्मत होईल ह्याची शक्यताच नव्हती. भारतीयांना हरवलं ह्या आनंदात SSG च्या गर्विष्ठ ब्रिगेड कंमांडरला जणू स्वर्ग दोन बोटं उरला होता. पण त्याला काय माहीत की त्याला प्रत्यक्षात स्वर्गात पाठवायलाच बाणा नावाचा यमदूत येत आहे. सारेजण बंकर बंद करून आरामात आत बसले होते. बाणाने बंकरचा दरवाजा उघडला आणि एक ग्रेनेड आत टाकला. आणि दरवाजा बंद करून घेतला. समोरासमोर युद्धाला प्रारंभ झाला. बाणाच्या सहका र्‍यांनी त्यांच्या लाईट मशिनगन्स सिंगल शॉटवर ऍडजेस्ट केल्या. इतक्या पराकोटीच्या थंडीत ऍटोमॅटिक वेपन एका वेळी फक्त एकच शॉट फायर करु शकतात. अतिशय जवळून चकमकीला सुरवात झाली.  पाकचे सहाजण तर जागीच ठार झाले. त्यातील दोन किंवा तीन जणांना बाणाने बायोनेटनी भोसकून ठार मारलं. समोरच्या माणसाला 18 इंची पात्याने असं भोसकून मारायला हृदय वज्रासारखं कठीण करायला लागतं. हल्लीच्या युद्धात तोफा, बंदुका याचा वापर होत असल्याने असं समोरासमोर युद्ध फारसं कधी घडतच नाही. वाटतं तेवढं हे युद्ध सोपं नाही. वेगात जाणारा घोडासुद्धा अचानक मधे आलेल्या प्रेताला तुडवून जाऊ शकत नाही. उंदराचं पिल्लू जरी हातून मारलं गेलं तरी दिवसभर त्याची रुखरुख लागून राहते. वेगानी जाणा र्‍या गाडीपुढे आलेलं कुत्रं किंवा मांजराचं पिल्लू चुकवतांना माणूस आपलं मरण ओढवून घेतो पण समोरच्या पिल्लाला चुकविण्याची शिकस्त करतो. मग समोर शत्रू जरी असला तरी तो हाडामासाचा जिवंत माणूसच असतो ना! भारतीय तुकडीच्या गोळ्या, ग्रेनेडस् आणि बायोनेट चुकवता चुकवता अजूनही काही SSG commandos मरण पावले.

               पाकिस्तानी सैन्याला जेंव्हा आपण कैद  हे ठाणं गमावतोय हे लक्षात यायला लागलं तसं त्यांनी अतीशय प्रभावी अशा air-burst ammunition चा भडिमार करायला सुरवात केली. बिघडत जाणारं हवामान, अंधारून आलेलं आकाश त्यामुळे धूसर झालेलं वातावरण, वर बरसणारे आगीचे गोळे आणि - आणि  अचानक एका गोळ्याने ओमराजचा हातच उडवला. ओमराजला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला गेला पण ओमराजने भारतमातेची सेवा करता करता अखेरचा श्वास घेतला. अखेर कैद ठाणं सर झालं. भारतीय बेसला तसे निरोप पोचले.

ओमराज आणि पाकिस्तानी सैनिकांची शवंही खाली आणण्यात आली आणि नंतर कारगिलला झालेल्या फ्लॅग-मिटिंगमधे पाकिस्तानी सैनिकांची शवं पाकिस्तानी सैन्याला सुपूर्त करण्यात आली.

                   ह्या सगळ्या मोहिमेची यशस्वी रीत्या आखणी करून ती प्रत्यक्षात अमलात आणून फत्ते करेपर्यंत  ह्या मोहिमेचाच भाग असलेले  ब्रिगेड कमांडर ब्रि. नौग्याल हे 27 जूनला सकाळीच बटालियन च्या लाँच बेसवर हजर झाले. सिंहाचा पराक्रम करून दाखविणा र्‍या बाणासिंग आणि त्याच्या इतर साथिदारांना  त्यांनी अत्यानंदानी त्यांनी घट्ट मिठी मारली. कदाचित ते म्हणाले असतील ‘गड आला अणि सिंह पण !’

                                 त्याचवेळी त्यांनी घोषणा केली की 22143फूट किंवा 6749 मीटर वर असलेलं कैद हे ठाणं ज्या बाणासिंगानी अतुलनीय शौर्य दाखवून पाकिस्तानच्या हातातून हिसकावून आणलं, ज्या बाणासिंगाचा देशाला आणि सैन्याला नेहमीच अभिमान आणि आदर वाटेल, त्याच बाणासिंगाच्या नावाने आता कैद ह्या ठाण्याचं नवं नामकरण होईल. आजपासून कैद ठाण्याचं नाव असेल, - ‘बाणा टॉप!’ ऑपरेशन राजीवसाठी बाणाला परमवीरचक्र, सुभेदार संसारसिंग ना महावीरचक्र तर बाकी सात जणांना वीरचक्र देऊन गौरविण्यात आलं.

                सुहृदहो! आपल्याला बाणाटॉप बघता आलं नाही तरी  दरवर्षी 26 जानेवारीला दिल्लीला होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामधे, युद्धामधे गाजविलेल्या अतुलनीय पराक्रमासाठी मिळणारा परमोच्च पुरस्कार- - ‘परमवीरचक्र’ छातीवर मिरवीत सैन्याच्या उघड्या जीप मधून ताठ मानेनी जाणारा हा ‘विजयी बाणा’  सियाचन मधल्या बाणाटॉप या यशाच्या उत्तुंग शिखराचं दर्शनच सर्वांना घडवितांना दिसेल!

--------------------------------




Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -