14 लडाख-

 

14 लडाख-

                     असं हे भारताच्या मस्तकावरील हिमालयाच्या मुकुटात वसलेलं लडाखचं 8000 ते 15000 फूट उंचीचं डौलदार पठार, मुकुटातील हिरकणीच म्हणायला पाहिजे.  विविध दगड ओळखण्यासाठी ज्या अनेक परीक्षा घेतल्या जातात त्यात दगडाचं काठिण्य ही एक प्रमुख परीक्षा असते. एखादा दगड रत्न म्हणून वापरला जावा की मूर्ती बनविण्यासठी उपयोगात आणावा की बांधकामासाठी वापरावा हे त्याच्या काठिण्यावर अवलंबून असतं. दगडाचाही कठिणपणा मोजायला ‘मोहज् स्केल’ हे परिमाण वापरलं जातं. 1 ते 10 ह्या कठिणपणाच्या चढत्या भांजणीत 1 कठीणपणा असलेला संजिर्‍याचा दगड सर्वात मृदु. त्यावर नखानीही चरा उमटला जातो. तर 10 काठिण्य असलेला हिरा हा सर्वात कठिण मानला जातो. 10 कठिणपणा असलेला हिरा 9 कठिणपणा असलेल्या माणकावर चरा उमटवू शकतो तर माणिक 7 कठिण असलेल्या पुष्कराजवर! ह्यासर्व उतरंडीत खिशातला चाकू 5-6 काठिण्य धारण करतो. तर काचेचा कठीणपणा 6-7 इतका असतो. काचेलाच काय पण धातूलाही कापू शकेल असा हा हिरा! अर्थातच लडाखला मी हिमालयाच्या मुकुटातील हिरकणी म्हणाले ते त्याच्या चमकदार वेगळेपणाने आणि तिथल्या साऊथपोलहून अधिक असलेल्या परिस्थितीच्या काठिण्यासाठी पण!

                          ग्रेट हिमालया, झन्स्कार, लडाख आणि काराकोरम ह्या एकाहून एक ऊंच पर्वत रांगांचं हे माहेरघर! पंचवीस हजार, सव्वीस हजार असा हजारातच ऊंचीचा हिशोब मांडणार्‍या आणि आभाळाशी स्पर्धा करण्यात  हजरजबाबी असलेल्या एकाहून एक उंच शिखरांचं हे वसतिस्थान! हृदयात धुमसणार्‍या कुठल्या कुठल्या ज्वालामुखींच्या तापाने पोळल्यामुळे त्यांनी डोक्यावर सतत बर्फाच्या एवढ्या लाद्या ठेवल्या आहेत  हे त्यांचं त्यांनाच माहीत! सतत वीस हजाराच्या पुढचीच बोली बोलणार्‍या खिंडींचं हे ठिकाण! बर्फाच्या पांढर्‍या शुभ्र चादरी पांघरून  अस्ताव्यस्त पसरलेल्या  हिमनद्यांचा हा परिसर! ध्रुवीय प्रदेश सोडले तर सर्व हिमनद्यांवर अधिसत्ता गाजवणारी सर्वात मोठी हिमराणी  सियाचन ही इथलीच आणि सर्व उच्चांकाचा उच्चांक गाठणार्‍या ह्या परिसराचा तापमानाचा नीचांकही उच्चांकीच! उणे दहा, उणे वीस, उणे तीस, उणे चाळीस उणे पन्नास असा उणे दहाचा पाढा उणे सत्तर पर्यंत खेचणारी कारगील, द्रास, पानद्रास, गुमरी, सियाचन ही ठिकाणंही इथलीच!

                           इतका लांबलचक  आणि हाडं गोठवणारा  हिवाळा इथले पाण्याचे सर्वच स्रोत गोठवून टाकतो. हवेतील बाष्पही गोठवून हवेलाही निर्दय कोरडेपण बहाल करतो. थंडीने एक एक पाऊल पुढे टाकायला सुरवात केली की वाहणार्‍या पाण्यातही आश्चर्यकारक आकाराचे जलस्फटिक निर्माण व्हायला लागतात आणि वाहणार्‍या पाण्यात हे सुंदर सुंदर आकाराचे बर्फाचे स्फटिक तरंगायला लागतात. ही स्फटिकांची तरंगती आणि संथ वाहती रांगोळी  डोळ्यांचं पारणं फेडते. आणि वाढत्या थंडीबरोबर हे स्फटिकांचे झेले वाढत वाढत चादर रस्त्याचं रूप धारण करतात. ह्या अवखळ जलमय कन्या हिवाळ्याच्या शापाने जणु पुतळ्या बनून जातात. नद्यांचं इतकं कोमल अंतरंग इतकं कठिण होतं की गाड्या, ट्रकही त्यावरून धावायला लागतात.  बेफाम वेगानी खाली कोसळणारे धबधबेही कोसळता कोसळता थंडीनी गोठून कुडकुडत पर्वतांच्या पोटाला माकडाच्या पिल्लाप्रमाणे चिकटून बसतात. परिकथेतल्या राक्षसाप्रमाणे इथल्या हिवाळ्याच्या थंडगार बोटांचा स्पर्श होताच सारा निसर्ग पुतळ्यासारखा प्राणहीन होऊन जातो. सर्वांना पुतळा पुतळा बनवायचा खेळ हिवाळा सहा महिने तरी खेळत राहतो. आणि सारा परिसर उजाड बेचिराख करून टाकतो. ओसाड वाळवंटात उंटाच्या वशिंडासारखे वाळूचे ढीग उरतात. आणि ह्या सँड-ड्युन्स मुळे धुळीची वादळंही होतात.

                         पण उन्हाळ्यात हेच तापमान जरा अधिक वीस च्या घरात गेलं की सूर्यदेवांचं किरणसैन्य अक्षरश तुमच्यावर तुटून पडतं त्याच्या ‘अल्ट्रा इफ्रा ’ शस्त्रांनी तुमचं अंग भाजून  कातडी सोलून काढतं.

                       पाऊस जरी दोन इंचापेक्षा जास्त झाला नाही तरी उन्हानी वितळलेल्या बर्फावर जीवन चालू रहातं.

                       पाण्याचा इथला मुख्य स्रोत म्हणजे सिंधुनदी. कैलासाच्या पायथ्याशी मानस सरोवराजवळ उगम पावलेली ही नदी तिबेटमधून वहात येत कैलासच्या प्रतिकृतीसारख्या छोट्या कैलास पर्वताला प्रदक्षिणा घालून पूर्ण 180 अंशात फिरून देमचोक जवळ भारतात प्रवेश करते. मानस सरोवरातून किंवा त्याच्या जवळून पाच नद्या उगम पावतात. त्यापैकी सिंधु, सतलज, कर्णाली आणि ब्रह्मपुत्रा भारतात येतात तर पाचवी नदी चीनमधे जाते. (ह्या पाचव्या नदीविषयी मात्र मला इतक्यावर्षांनंतर माहिती उपलब्ध झाली नाही). असं म्हणतात, ह्या नद्या विविध प्राण्यांच्या मुखातून बाहेर पडतात. आणि त्या त्या नद्यांच्या काठी रहाणार्‍यांना त्या ते ते गुण प्रदान करतात. सिंधुला लडाखी भाषेत ‘सिंघे चो’ म्हटलं जातं. - - सिंहाच्या मुखातून उगम पावलेली. सिंघे हा संस्कृतच्या सिंहचा अपभ्रंश! तर ‘चो ’ म्हणजे वाहणारा पाण्याचा प्रवाह   - - हा तिबेटन शब्द! ही नदी सिंहमुखी असल्यामुळे हिच्या काठी राहणारी प्रजा ही सिंहासारखी शूर असते. मोराच्या मुखातून वाहणार्‍या सतलजकाठचे लोकं मोरासारखेच सुंदर आणि कलासक्त असतात. (सतलजला प्राचीन भारतीय इतिहासात फार सुंदर नाव आहे - `शतद्रु' म्हणजे शत शत धारांनी द्रवणारी.) तर हत्तीच्या मुखातुन बाहेर पडलेली ब्रह्मपुत्रा हत्तीच्या पायांनी विनाश करत जाते. ह्या सिंधूला झन्स्कार , शिंगो आणि शोक ह्या नद्या मिळतात. काराकोरम खिंडीतून पूर्वापार चालत आलेल्या सिल्क ट्रेड रूटने येणार्‍या प्रवाशांना शोक नदी सात वेळा पार करावी लागे. आणि दरवेळी त्यांच्या हालांना पारावार न ठेवणार्‍या ह्या नदीला त्यांनी शोक हेच नाव प्रदान केलं.

                        98000 स्क्वेअर कि.मी. पसरलेल्या लडाख परिक्षेत्राचे दोन भाग पडतात. एक ले-लडाख आणि दुसरा कारगील. हेच लडाखचे दोन जिल्हे. अतीशय मोठे आणि अतिशय तुरळक लोकवस्तीचे. अख्खी मुंबई जरी नेऊन वसवली तरी प्रत्येकाला पाच एकराचा बंगला सहज मिळेल इतके विस्तीर्ण! सांस्कृतिक दृष्ट्या मात्र दोघेही भिन्न! ह्या भागाची लोकसंख्या मात्र जेमतेम दीड दोन लाख असेल. पाण्याच्या आजुबाजूला वसलेली छोटीछोटी
 गावं  एवढीच ही वस्ती. तिबेटन, बाल्टी, दार्द आणि मॉन्स ह्या चार वंशांच्या मिश्रणातून तयार झालेली ही लोकवस्ती. मॉन हे मूळचे आर्य वंशीय. त्यांचे नाकेडोळेही इतरांपेक्षा उठून दिसतील असे वेगळे. गुरांचे कळप घेऊन हिंडणारे हे लोक, त्यांची वाद्ये वाजवत लोकांचं मनोरंजन करत फिरत असतात. पण इतर वंशांबरोबर रोटीबेटीचा व्यवहार मात्र त्यांना मान्य नाही. दार्द वंशाच्या लोकांचा भूतकाळ लडाखच्या मातीतच विरून गेला आहे. हे द्रासच्या खो र्‍यात राहणारे दार्द, मुसलमान असले तरी सिंधूच्या खोर्‍यात राहणार्‍या दार्द लोकांनी आपला मूळचा बौद्ध धर्म आणि बौद्ध संस्कृती चांगलीच जपली आहे. मध्यपूर्व लडाखमधे असलेले तिबेटन वंशाचे लोक हे सर्वात मुख्य! पण वर्षानुवर्षांच्या इतर जमातींबरोबर मिळूनमिसळून राहिल्याने ते दुधातल्या साखरेसारखे इतरांबरोबर मिसळून गेले आहेत. त्याच्याशिवाय तिबेट सोडून भारताच्या आश्रयाला आलेले काही मूळ तिबेटन वंशाचे लोक चोग्लमसरला राहतात. अन्य काही ठिकाणीही त्यांच्या वस्त्या वसवण्यात आल्या आहेत. तर चांगपा हे भटके लोकं त्यांच्या पश्मिना शेळ्यांचे कळप घेऊन लडाखच्या पूर्व पठारावर फिरत असतात. बाल्टी मात्र लडाखच्या पश्चिमेकडे कारगीलच्या आसपास स्थायिक झाले आहेत. तर मध्य आशियातले ‘साका’ नुब्रा व्हॅलीच्या आश्रयाला गेले आहेत. ह्या सर्व वंशांच्या आणि धर्मांच्या लोकांच्या सामंजस्यातून, त्यांच्या निरनिराळ्या सांस्कृतिक,व्यावसायिक कौशल्यातून उदयाला आलेली लडाखची संस्कृती, निसर्गाशी सतत जमवून घेऊन नुसतीच टिकून न राहता खूप कष्ट करून निसर्गावर मात करुन सतत हसतमुखाने रहायलाही शिकवते.

                    डोंगरांच्या माथ्यावरील बर्फ उन्हाळ्यात वितळायला लागलं की वाहणार्‍या झर्‍यांच्या पाण्याचं योग्य नियोजन करून ते शेतीसाठी वापरण्यात बाल्टी लोक फारच हुशार आहेत. ग्रॅनाईटचे बनलेले डोंगर कापून त्याच्या उताराचा फायदा घेत त्यावरून लांबच लांब कॅनॉल्स बनवून पाहिजे तिथे हे पाणी वळवून आणलं जातं, आणि शेती केली जाते. ले ते कारगील रस्त्यावर पाणी वाहून नेणारे असे अनेक कॅनॉल्स पहायला मिळतात. बार्ली ज्याला इथे सत्तु म्हटलं जातं ते इथलं मुख्य पीक.  बार्ली भाजून त्याचं पीठ केलं जातं त्याला त्साम्पा म्हणतात. गुरगुर चहाबरोबर ते खाल्लं जातं.

                   कारगीलची मैत्र काश्मीर व्हॅलीबरोबर तर लद्दाखचं सख्य सीमेपलीकडील तिबेटसोबत. कारगीलमधे गोरे, सडपातळ, लांबट चेहर्‍याचे, लांब नाकाचे, सुंदर कशिदा काढणारे बहुसंख्य बांधव मुस्लीम धर्माचे. तर उर्वरित लद्दाखचे लोकं मंगोलिअन चेहर्‍याचे, किंचित पिवळ्या वर्णाचे, दिसायला गोल गोबर्‍या गालाचे चिमुकल्या मासोळी डोळ्यांचे, गोड हसर्‍या चेहर्‍याचे, बुद्ध धर्माचं पालन करणारे. ड्रॅगॉन पेंटिग्ज आणि तिबेटी अंगाने गालिचे विणणारे.  आकाशाचा नीलिमा आणि प्रशांत सागराची निळाई कितीही बेमालुमपणे एकमेकात मिसळून जाणारी असली तरी क्षितिजाची रेखा जशी त्यांना कायम वेगवेगळंच ठेवते तसे तिबेट सोबत कितीही गहिरे संबंध असले तरी इथली LC (line of control)  ह्या दोघांना कायम वेगवेगळंच ठेवते. अनेक निर्वासित तिबेटी लोकं इथे स्थायिक झाले असले तरी त्यांच्या काही परंपरा ते वेगळ्या जपतात. लडाखी बांधव `जुले ' म्हणून स्वागत करणार तर तिबेटी ‘ताशी दलेक’ म्हणून! ताशी मधल्या त चा उच्चार हा ट कडे झुकणारा. दोघेही गोंचा  घालत असले तरी तिबेटन स्त्रिया लग्न झाल्यावर रंगीबेरंगी आडव्या रेघा असलेला अर्धा ऍप्रन पुढे बांधतात. लडाखी बायका मात्र असा ऍप्रन वापरत नाहीत. लडाख मध्येही मुस्लीम समाज आहे. पण तो कारगीलपेक्षा वेगळा. इथले मुसलमानही मंगोलिअन चेहर्‍याचे शिया असले तरी आदिवासी ट्राइबमधले तर कारगीलचे मुसलमान सुन्नी पंथाचे. ख्रिश्चन कम्युनिटीनेही इथे हजेरी लावली आहे.  इथे कोणाला धर्माची सक्ती मात्र नाही. (काही फॅमिलीज)एकाच घरातील लोक बुद्ध, मुस्लीम आणि ख्रिश्चन ही असू शकतात. आता काश्मीरच्या दहशतवादाला घाबरून आणि सरकारी सेवेमुळे तिथले काही पंडित म्हणजे हिंदूमंडळीही इथे येऊन दाखल झाले आहेत. त्यांचे गुलाबी गाल, बदामी डोळे, आणि विवाहित स्त्रियांच्या कानातील खांद्यांवरूनही खाली येतील इतक्या लांबच लांब  सोनसाखळ्यांची कुंडलं पाहुन ‘वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले’ अशी मोहिनी पडे. जपानहून आलेल्या ‘नाकामुरा’ह्या बुद्धिस्ट माँकने इथे अतिशय मोक्याच्या जागी डोंगरमाथ्यावर शांतिस्तूप बांधून लोकांना भुरळ पाडली आहे.

                          देशाच्या सीमारेषेवर  असलेल्या प्रदेशावर अनेकांच्या भल्या बुर्‍या नजरा रोखलेल्या असतात एवढं मात्र खरं.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           त्यांची दृष्ट आपल्या देशाला लागू नये ही नुसतीच प्रार्थना कशी बरं फळेल? काही पाश्चिमात्यांचे  शाळांवरील प्रेम पाहिले की त्यांनी पृथ्वीच्या नकाशावरून भारत- -त्यामधील लद्दाख- -त्यामधील ले - -आणि तिथल्या कानाकोपर्‍यातल्या शाळा विना गुगल मॅप कशा शोधून काढल्या ह्याचं कौतुक वाटे, तर आपल्याकडच्या कोणा दानशूराला इथे नजरही टाकावी असं वाटू नये ह्याची खंत! आज ह्या गोष्टीला 25-26 वर्ष उलटून गेली. लडाखमधे भारतीय लोकांचा प्रवासही वारंवार होऊ लागला. पण आजही तिथल्या आपल्याच लोकांबरोबर आपुलकीचा, मैत्रीचा आणि देवाणघेवाणीचा हात पुढे करायला मात्र पाहिजे त्या प्रमाणात कोणीच पुढाकार घेत नाहीत ही रुखरुख सांगितल्याशिवाय  राहवत नाही. आपली ही उदासीनता सर्वच हिमालयन रीजन बेल्ट मधल्या लोकांसाठी कायम आहे.

------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -