15 सरपंचांची भेट-
15 सरपंचांची भेट-
आम्ही
ले गावच्या सरपंच किंवा मुखियांना भेटायला गेलो. त्यांना लंबरदार म्हणत. कॅलाँग! कॅलाँग
नाव त्यांचं! त्यांनी शालीप्रमाणे खतक घालून
अतीशय आदबीने स्वागत केलं. म्हातारा भारी गोड होता. लडाखच्या प्रगतीचा दूरदर्शी तिसरा
नेत्रच जणू त्याला होता. बोलता बोलता लडाखची परिस्थिती, तिथलं खडतर आयुष्य, आर्मीवर
त्यांचं अवलंबून असलेलं जीवन ह्या बद्दल विषय आल्या आल्या त्यांनी सांगितलं - “लडाख
हा कितीही दुर्गम भाग असला तरी तो हिवाळ्यातसुद्धा जवळपासच्या अनेक भूभागांना कायम
जोडलेला राहतो, त्यामुळे दळणवळण, व्यापारउदीम कायमच चालू राहतो. आमच्या परिक्षेत्रात
सर्व जीवनोपयोगी वस्तू मिळतात किंवा तयार होतात. मिठासाठीही आम्ही कोणावर अवलंबून नाही.
चीनसीमेवर असलेल्या अक्साईचीन परिसरात ड्राय सॉल्ट लेक्स आहेत. रॉक सॉल्टच्या खाणींमधून
फार पूर्वापार खेचरांवरून आम्ही मीठ आणतो. किंबहुना मीठ आणण्यासाठी खेचरं घेऊन गेलेल्याच
काही लोकांच्या पहिल्यांदा लक्षात आलं की चीन, अक्साईचीन येथे पक्का रस्ता बांधत आहे. आणि त्यामुळेच चीनची घुसखोरी
उजेडात आली. आमच्याकडे सत्तु होतोच. वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या आम्ही कापून वाळवून
ठेवतो. कच्चं मांसही वाळवून ठेवायची आमची प्रथा आहे. वाळवलेले जर्दाळू आणि सफरचंदंही असतातच. थंडीमधे
ह्या वाळवलेल्या भाज्या व मांस आम्ही वापरतो. पूर्वापार चालत आलेल्या व्यापारामुळे
आमचे लोक चांगले श्रीमंत आहेत.” तिथल्या लोकांच्या श्रीमंतीची एक विनोदी किस्साही त्यांनी
ऐकवला. “जेंव्हा ले मधे पहिल्यांदा स्टेट बँक ऑफ इंडिया सुरू झाली तेंव्हा अनेकांनी
बँकेत पैसे ठेवायला नकार दिला. कधी बँकेला जरूर पडली तर तिला उसने देता यावेत म्हणून!''
``आर्मीमुळे आमच्या लोकांनाही डाळ- भाताची, आणि आटा मिळण्यामुळे रोटीची सवय लागली आणि
आम्ही परावलंबी झालो. आमच्याकडे मिळत नसेल तर फक्त साखर. पण इतके दिवस आम्हाला त्याची
जरुरही नव्हती. आम्ही नमकीन चहाच पीत होतो. पण आता मात्र आमच्याही सवयी बदलल्या आहेत.
पण आमच्याकडे सर्वात मोठी कमतरता आहे ती चांगल्या शिक्षकांची. आम्हाला चांगले शिक्षक
पाहिजेत. एकवेळ खायला प्यायला चांगलं नाही मिळालं तरी चालेल. पण आमच्याइथे जोपर्यंत
चांगले शिक्षक मिळत नाहीत तो पर्यंत लडाखचा विकास होणार नाही. जिथे उत्तमोत्तम शिक्षक
नाहीत तिथे प्रज्ञावान मुलं आणि सजग समाज निर्माण होण दुरापास्तच! आता आर्मीमुळे काहीप्रमाणात
त्यांच्या फॅमिलीज् ही यायला लागल्या आहेत. ह्या शिकलेल्या स्त्रियांमुळे आम्हाला थोडासा
उजेडाचा कवडसा दिसत आहे. आमच्या इथे कोणी बाहेरचे डॉक्टर कसे येतील? आमच्या मुलांनीच
डॉक्टर बनायला पाहिजे.'' मी लॅमडॉन शाळेत शिकवते हे त्यांना सांगायच्या आधीच माहीत
होतं. मुलांना माझं शिकवण आवडलं आहे हे त्यांच्याकडून कळल्यावर मलाही जरा बरं वाटलं.
अर्थात आज लेची परिस्थिती खूपच वेगळी असेल. आणि ले चे डॉक्टर इंजिनिअर तयार झाले असतील
ह्याची मला खात्री आहे.
-------------------------
Comments
Post a Comment