17 सुट्टीला घरी -

 

17 सुट्टीला घरी -

                     सुट्टी घेऊन आम्ही डाऊनला जाणार होतो.  ले ते कन्याकुमारी असा सर्वात लांब प्रवास आम्ही LTC घेऊन करणार होतो. इंद्राच्या सेवेला ऐरावत झुलत होता. आमच्या सेवेला गजराज (IL 76 Boing )पंख लावून तयार होता. गजराज हे Airforce चं इथलं खास विमान! गेले अनेक दिवस वाईट हवामानामुळे लेला एअरलाइन्सचं विमान उतरु शकलं नव्हतं. आजारी असलेले सैनिक, घरी आलेल्या अचानक अडचणींमुळे घरी आपल्या जवळच्यांना भेटण्यासाठी उत्सुक जवान आणि आर्मीचं सामान घेऊन जाणार्‍या ह्या विमानात थोडी जागा आमच्यासाठी शिल्लक होती. विमानात बसायला समोरासमोर लांबलचक बाक होते. मधे सर्व सामान भरलेलं होतं. विमानात असं एका लाइनीत बसून प्रवास करायचा अनुभव फारच दुर्मिळ होता. त्यानिमित्ताने भारतीय जवानांबरोबर प्रवास करता आला.

                   तशी एअरलाईन्सच्या विमानाचीही एक वेगळी गम्मत होती. सीट नंबर नाही. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली की विनाआरक्षित डबा पाहून पळत जाऊन जागा पकडावी तसं पळत जाऊन विमानात खिडकीची जागा पकडायची. खिडकीशेजारची जागा मिळाल्याचा आनंद शेजार्‍याला जुले जुले म्हणून लगेच हसून साजरा करायचा. हे माझं हे तुझं असं भांडायचं नाही. सगळं विमानच एखाद्या निर्मळ निर्झरासारखं खळखळून हसत असे. ह्या जुले जुले म्हणून मनमोकळेपणाने हसण्याची इतकी सवय होऊन गेली की एकदा दिल्लीहून मुंबईला येणार्‍या विमानात  माझ्या शेजारी येऊन बसलेल्या एका टायवाल्याला मी खळाळून हसत नेहमीच्या सवयीने पण लक्षात ठेऊन जुले ऐवजी good---morning!!!! म्हणाले खरं पण त्यानी `आत्ताच  - - सुटून आलेली दिसते' अशा आशयाचा असा काही कटाक्ष टाकला की माझं हसूही गोठून गेलं. त्याच्या सूटबरोबर चेहर्‍याचीही इस्त्री त्याने बिघडू दिली नाही. काय गम्मत होती, - - जिथे पाणी गोठून दगड  होत होतं, तिथे निर्मळ हास्याचे झुळझुळणारे झरे होते; आणि जिथे सुखसुविधांची गंगा यमुना वहात होती तिथे ‘माझ्या मना बन दगड’ चा सक्त आदेश होता.

                      थंडीत लेच्या एअरपोर्ट पासून दिल्ली किंवा चंडीगडच्या एअरपोर्टपर्यंत अजून एक सामुदायिक कवायत होत असे. एअरपोर्टमधे शिरल्यावर विमानात बसण्यापूर्वी सर्वांच्या अंगावरचे जाडजूड कोटपरखा, डबल डबल घेतलेल्या शाली, टोप्या, मफलर्स उतरवून बॅगा उघडून ते बॅगेत कोंबले जात. डाऊनला विमान टेकलं की विमानातून बाहेर आलं की अंगावरची अजून अजून आवरण काढून बॅगा उघडून ती बॅगांमधे कोंबली जात.  कित्येकवेळा माणसं एअरपोर्टच्या रेस्टरूममधे जाऊन सर्व थर्मल्स उतरवून पुढच्या प्रवासाला तयार होत. एअरपोर्टमधून बाहेर पडतांना बहुतेकांच्या अंगावर शर्टपँट किंवा पंजाबीसूटशिवाय काही नसे तर डाऊनचे लोक मात्र गरम स्वेटर्स, शाली घेऊन फिरतांना दिसत. ले ला जातांना मात्र हा सगळा घटनाक्रम अगदी असाच पण  उलट क्रमाने घडत असे.        

                    आम्ही कोणी मुरलेले खव्वय्ये नव्हतो तरीही लेहून चंडीगडला गेल्यावर काय काय खायचं ह्याची लिस्ट आमच्या प्रत्येकाच्याच डोक्यात घोळत होती. सेक्टर 17 मधले छोले भटुरे, देसी घी की जिलेबी,रबडी अशी स्वप्न आम्हाला पडत होती. “आई मावशीकडे गेलं की मला पांढरं लोणी पाहिजे” इतरवेळी खाण्यासाठी कणादच्या मागे लागावं लागे. पण लेराजानी चांगलीच सुधारणा घडवली म्हणायची. आम्ही चंडीगडला उतरल्यावर रेस्टहाऊसवर जाऊन आवरून तयार झालो. आम्हाला तिघांनाही ब्रेकफास्टची स्वप्न पडत होती. छोले भटुरे, जिलेबी रबडी खाऊन कसं मस्त वाटत होत. लहान असतांना कोणी अधाशीपणे काही खाल्लं तर त्याला ‘कारे भुके बंगालातून आला का?’ असा सवाल विचारला जाई. आता ले हून आलेला दिसतोय असं म्हणायला हरकत नाही. भरपेट खाऊन झाल्यावरही आम्ही तुपातल्या जिलबीचा पुडा बांधून रेस्टहाऊसवर परत येत होतो. 15-20 मिनिटं गाडीने लागणार होती. कणाद ड्रायव्हर काकांच्या शेजारी पुढे बसला होता आणि आम्ही मागे. उतरल्यावर त्याला सांभाळायला दिलेला पुडा कुठे विचारल्यावर माझ्या हातात त्याने फक्त बाहेरची कागदाची पिशवीच ठेवली. जाता जाता आतल्या जिलब्या कधी संपल्या हे त्याच्या लक्षातही आलं नाही. आमची सर्वांचीच हसून हसून पुरेवाट झाली

                  चंडीगडला उतरलं तर चंदिगडहून अंबाल्याला जायला लागे. तिथून ट्रेन! पण ट्रेन आणि  विमानाच्या प्रवासात दोन तीन दिवसांचं तरी अंतर ठेवावं लागे. कारण खराब हवामानामुळे विमान रद्द झालं तर ट्रेनही चुके. सुदैवानी डाऊनला येतांना लेराज कृपेने आमचं विमान कधीही रद्द झालं नाही. चंडीगडहून लेला जातांना मात्र  हवामान बिघडल्यामुळे आठ ते पंधरा दिवस रोज विमानतळाच्या भोज्याला शिवून आम्हाला रेस्टहाऊसला परत यायला लागलं होतं. लेवरून डाऊनला येण्यासाठी एक तर रजा घ्यावी लागे. आपल्या नातेवाईकांना भेटायची प्रचंड ओढ लागलेली असे. त्यातही विमानाने पाठ फिरवली तर बहुतेकांची रजा ले मधे तिथेच संपुन जाई. आणि जड अंतकरणानी घरच्यांच्या फक्त आठवणी काढत पुन्हा त्यांना लेला ड्युटीवर हजर व्हावं लागे.

 

                   मुंबई आल्यावर तर अनेक महिन्यांनंतर कणादला पहिल्यांदा हाफ पँट आणि टी- शर्ट विकत घेण्याची वेळ आली. आणि ते घातल्यावर पहिले दोन दिवस तरी तो आपल्याच उघड्या दिसणा र्‍या हातापायांना झाकत, “आई मला नंगा नंगा वाटतयं” म्हणत राही. किलोवारी कपडे अंगावरून उतरवल्यानंतर आम्हालाही फुलपाखरासारखं हलकं झाल्यासारखं वाटे; आणि सतत पहाणार्‍याला डोंगर पोखरून उंदीर बाहेर निघाल्यासारखे!

               प्राणवायूच्या कमतरतेमुळे लडाखमधे खूप दिवस राहिलं तर मेमरी लॉस होतो असं म्हणतात. बहुधा ते तिथल्या हवामानापेक्षा इतर जगापासून पूर्ण वेगळं करणार्‍या हिमालयामुळे असायची शक्यता जास्त होती. बाथरूममधे गेल्यावर आम्ही कितीतरीवेळा बादली तपेली शोधत असू. नळाला पाणी येतं हे विसरायलाच झालं होत. मग शॉवर इत्यादि गोष्टींकडे हातच जात नसे.

जर्दाळूचं पुडिंग ही सर्वश्रेष्ठ स्वीटडिश आमच्या मनावर कोरली गेली होती त्यामुळे लाडू, चिवडा, पुरणपोळी पासून पिठलं भाकरीपर्यंतच आम्हाला जाम अप्रूप वाटत होतं. भाकरीवर पांढरा लोण्याचा गोळा पाहून कसलं भारी वाटत होतं.

              पांडव वनात जातांना शमीच्या झाडावर त्यांची शस्त्रे ठेऊन गेले होते. ले ला जातांना बहिणीकडे आणि इतर मित्र आणि नातेवाईकांकडे आमचे सर्व सामान आणि फर्निचर आम्ही ठेऊन गेलो होतो.

--------------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -