20 वसंत ऋतु -

 

20 वसंत ऋतु -           

                    जून ते सप्टेंबर म्हणजे ले मधला जमिनीतून हिरवं आणि विमानातून पाहुणे उगवायचा काळ! मृतवत् पडलेल्या निसर्गात जीवन संचारतांना बघणं, एका चैतन्याचा दृश्य आविष्कार किंवा जन्म होतांना बघणं, ही किती अद्भुत गोष्ट आहे. एखाद्या फिनिक्स पक्ष्यासारखं राखेतूनही उठावं कसं? जगावं कसं?  ही दुर्दम्य इच्छाशक्ती झाडांकडूनच शिकावी. बाहेरची परिस्थिती बदलत नसेल तर आपणच बदलल पाहिजे. वेळ आली तर मृतवत् बनून राहिलं पाहिजे आणि योग्य वेळ येताच बहरता ही आलं पाहिजे. कुरकुर न करता! परिस्थितीला जराही नावं न ठेवता! अशी अहंकाराची खोळ दूर झाली की नवकोरं लखलखीत आयुष्य समोर स्वागतासाठी हात जोडून उभं असतं. उणे 20-25 च्या थंडीनंतर वठलेल्या झाडांना वसंताची चाहूल कशी काय लागली कोण जाणे. त्यांच्या खोडांचा लाकडी रंग अचानक धुगधुगी दाखवायला लागला. लालसरपणाची छटा खोडाखोडातून डोकवायला लागली. त्यांच्या धमन्या-धमन्यांमधून जीवन धावायला लागलं. जीवनाची एक विलक्षण प्रभा झाडाभोवती तयार होऊ लागली. विपिंग  विलोज् च्या खराट्यासारख्या राहिलेल्या काड्या, काटक्यातून दिसणारे  रंग-बदल पाहिल्यावर लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवली. - - मेलेल्या सिंहाची हाडं गोळा करून त्याचा सांगाडा तयार करून त्याच्यावर रक्तमांस तयार करून नंतर त्याच्यात प्राण ओतणार्‍या चार ब्राह्मणांची! ते पढतमूर्ख होते आणि साक्षात् त्यांच्या मृत्यूला जिवंत करत होते ही गोष्ट वेगळी ! पण माझ्या समोर कोणीतरी अदृश्य शक्ती संपूर्ण निसर्गाला जिवंत करत होती. जिवंत होण्याचा तो थरार मी अनुभवत होते.  एका रात्री निसर्ग देवता सगळ्या जर्दाळूंच्या झाडांच्या फांद्या फाद्यांवर मोहरी एवढ्या पांढर्‍या ठिपक्यांची दाट रांगोळी कधी रेखून गेली कळलच नाही. थंडीला दिलेले हे पूर्णविरामाचे ठिपके दिसामाशी गोल गोल वाटोळे होत काही दिवसात मोत्याएवढेही झाले. मोत्यांनी लगडलेली ही झाडं वार्‍यासोबत डोलू लागली. त्यांचा आनंद त्यांनी न बोलताच ओसंडून जातांना दिसत होता. आणि एका संध्याकाळी ‘होता फुले कळ्यांची’ ही अनुभूती घेत रात्रभर झाडं जागली. सकाळी सारी सारी झाडं पांढर्‍या फुलांनी बहरून आली. Happy Birthday to me!!! असं  स्वतःलाच म्हणवून घेत स्वतःचा जन्म सोहळा स्वतलाच पुष्पगुच्छ देऊन - -नाही नाही - - स्वतःच पुष्पगुच्छ होऊन साजरा करायची ही त्यांची ही मनोरम अशी अभिनव रीत आपणसुद्धा घ्यावी असं वाटायला लागलं.




                      सूर्यदेवाची कृपा त्यांच्यावर वरतून बरसत होती. प्रत्येक कणाकणाला आपलं सोनेरी बोट लावून सूर्य जागं करत होता. “उठा उठा!” जमिनीखाली झोपलेले अंकुर जागे होऊन हिमाची आणि धरणीची दुलई दूर करून वर डोकावत सूर्याला ‘सुप्रभात’ म्हणत होते. सफरचंद, आणि बाकी इतर झाडं पर्णकळ्यांचे हात जोडून नमो नमः, नमो नमः। म्हणत होती. निसर्गाचा हा Thanks giving चा सोहळा रंगत चालला; आणि पानांनी उघडलेल्या ओंजळीत सवित्याने भरभरून जीवनाचं दान ओतायला सुरवात केली. पानं, फुलं, सुगंध यांनी परिसर गजबजून गेला. मदनाचं दुसरं नाव अनंग! अंग नाही असा! शरीरविरहित तरीही विश्वविजयी! फुलांचं सौदर्य आणि सुवास हेच त्याचं अस्तित्त्व! ज्याच्या दर्शनानेच मनात धडकी भरते अशा लेच्या ध्यानस्थ बसलेल्या, निसर्गरूप शंकराला महापराक्रमी मदनाने फुलांचा सुवासिक बाण मारून ‘उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी’ म्हणत खडबडवून जागं केलं.  हसत हसत जागं केलं. - - त्याच्या नंतरच्या क्रोधाची पर्वा न करता.  

                          थंडीपासून संरक्षण म्हणून थंडीच्या सुरवातीलाच पोती बांधून ठेवलेल्या हॉलीहॉकवरील पोती आमच्या माळ्यांनी काढल्यामुळे त्यांनीही छाती भरून मोकळा श्वास घेतला. तेही एका एका पाना पानाने उंच होऊ लागले. चंद्राच्या सोळा कला बघणं जितकं नितांत सुंदर असतं तेवढच ह्या रोप-बालकांना वाढतांना पहाणं! त्यांचे फुलांचे चेहरे फुलून आनंदाचा मळा डोलायला लागला आणि सारा परिसर आनंदून गेला. 

                    अर्थात मी म्हणाले त्या परिसराचा पसारा जीवनदान देणार्‍या निर्झरांच्या किंवा नद्यांच्या परिसरांपुरताच मर्यादित होता. बाकी डोंगर तितकेच निर्ममपणे उभे होते. ‘बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे’ ह्या कुसुमाग्रजांच्या ओळीची आठवण देत! आमच्याकडे आलेल्या बहुतेक पाहुण्यांना आमच्या घराच्या मागे पुढे ओसाड डोंगर पाहिले कि प्रश्न पडे की ह्याच्यावर अजूनही कोणी वृक्षारोपण कसं केलं नाही? पण त्यांच्यावर बाग फुलवणं ही मंगळावर बाग फुलवण्याइतकीच उदात्त पण कल्पनेपर्यंतच मर्यादित कहाणी होती. प्रयत्न केला नव्हता असं नाही. पँगाँगत्सो लेकच्या परिसरात खुरटी वाढलेली अनेक झाडं लोकांच्या उत्साहाचंच प्रतीक म्हणून जगत होती. पण  त्यांचं असं त्राणहीन जगणं हे डायलिसिसवर ठेवलेल्या माणसाइतकंच केविलवाणं होतं. नंतर काही काळाने अमेरिकेत वॉशिंग्टनच्या व्हाईटहाऊस समोरही जगातील सर्व झाडं लावायचा हा केविलवाणा प्रयत्न पाहून मला त्या झाडांची दया आली. त्यांना ह्या असह्य थंडीतून पळून जाता येत नाही म्हणून मानवाने त्यांच्यावर एवढा अत्याचार करायचा? शिवाय स्थानिक लोक ह्या वृक्ष लागवडीला घाबरून असत. वृक्ष लावले तर पावसाचं प्रमाण वाढेल अशी त्यांना भीती असे. `` क्या करे सर! डाऊनसे लोग आते है वो हमारा प्रॉब्लेम समझ नही सकते है न!'' असं त्यांचं म्हणणं असे. पावसावर त्यांचं जीवन अवलंबून नव्हतं. होतं ते हिमपातावर आणि विरघळलेल्या हिमाच्या झर्‍यांवर! नद्यांवर! इथले डोंगर उंच असले तरी कणखर नव्हते. पाऊस पडला तर  प्रचंड भूस्खलन होण्याचे धोके होते.

                     आमच्या काही फुलवेड्या मित्रांनी पुण्याहून ‘पोचा सीड्स्’  च्या आणलेल्या सूर्यफुलांच्या बियांनी ताटाएवढी सूर्यफुलं फुलवली. त्यांचा एवढा मोठ्ठा आकार हा मात्र इथल्या मातीचा, पाण्याचा आणि सूर्याचा प्रताप होता.  ह्या सगळ्यात सुमनसखा भुंगा किंवा फुलपाखरू नसेल तर ह्यांचं परागीवहन होणार कसं? मनात विचार यायला आणि घोंगावत एक भली मोठी ‘माशी ग माशी शी शी शी’  हातावर येऊन बसली. “शीऽऽऽऽऽ”!! म्हणून मी जरी तिला कितीही नाकारलं तरी निसर्गात तिचं स्वागतच होतं. एवढ्या नाजूक फुलांवर घोंघावणार्‍या त्या मोठ्या मोठ्या माशा  सार्‍या खिंडी पार करून इथे कशा पोचल्या ना कळे. जेमतेम चार महिन्याच्या काळाचं झाडांनी मांडलेलं जीवनाच्या वेळापत्रकाचं गणित अजब होतं. जर्दाळूंना आधी आतला बदाम मग त्याच्यावर कवच मग त्याच्यावर रसाळ गर असं पद्धतशीर नटायला आणि नजाकतीनी स्वतला पेश करायला वेळ लागणार आणि शिवाय नंतर त्यांना कडकडीत उन्हात वाळवून ठेवायला माणसांनाही वेळ लागणार हे ओळखून अंगात साठवलेली सारी शक्ती पणाला लावून झाडांनी आधी कळ्या, फुलं आणि फळं निर्माण केली होती. स्वतला लागणारं अन्न तयार करायला आता ते सुरवात करणार होते. पांढर्‍या फुलांसोबत पर्णकळ्या डोकावू लागल्या होत्या. आणि सोबत छोटे छोटे जर्दाळूही! थोड्याच दिवसात पिवळ्या सोनेरी रसाळ जर्दाळूंनी झाडांवर धमाल उडवून दिली.

                          सफरचंदांचा, - - पर्णकळ्या - - पानं -- कळ्या - -फुलं आणि गोल गोल सुबक सुंदर लालचुटुक छोटी छोटी सफरचंदं हा जीवनप्रवास पाहतांना आमच्याही मनात चैतन्याचा तरु डोलायला लागला. जाता येता आपल्या घरातील सफरचंद हातांनी तोडून खायची गम्मत काही औरच होती. ही सफरचंद वेगळ्या जातीची, अतिशय सुवासिक,छोटी छोटी नाजूक, तलम अंगकांतीची. पेटीतून बाहेर पाठवली तर रुसणारी! त्यांचा तिथेच रसास्वाद घेतला पाहिजे. पण लेच्या उन्हात सफरचंदंही कडकडीत वाळू शकतात. थंडीत माणसापासून ते गाईगुरांपर्यंत सर्वांना खायला द्यायला ही चांगली. - - - छे!! परत कसा लेखणीतून शब्द निसटून गेला? इथे गाई नाहीत. याक , गाढवं, शेळ्या मेंढ्या यांचा थंडीतला हा खुराक!

                  शेता शेतात याकांकडून नांगरणी आणि पेरण्या होऊन सत्तु डुलायला लागला. वार्‍याच्या झुळकी झुळकी बरोबर त्यांच्यामधून  आनंदाच्या लाटा पळायला लागल्या. आमच्या किचन गार्डनमधेही निरोगी कोबी प्लॉवरांची रांग लागली. इथे त्याला खतं आणि रोगप्रतिबंधकांची गरजच नव्हती. सूर्याच्या अल्ट्रा, इन्फ्रा इत्यादि दूतांनी त्यांची चांगलीच काळजी घेतली होती. सहज पाच सात किलोचा एकेक प्लॉवर आणि कोबी, दोन दोन किलोचे मुळे, गाजरं अशी कांदा,मुळा भाजी रूपी विठाबाई  शेतातून प्रकट झाली. आमचे दोस्त अचानक येऊन पावभाजीची फर्माईश झाली की घरातला ताजा कोबी, प्लॉवर यांची पावभाजी सर्व्ह करतांना कोबीच्या खालच्या पानांचा फुलोरा पावभाजीचं कॅसेरॉल ठेवायला मी आरास म्हणून वापरत  असे. आणि त्यानेच आमचं डायनिंग टेबल भरून जात असे. farm fresh भाजीच्या पावभाजी वर सर्वजण तुटुन पडतच आणि वर  हिरव्यागार कोबीची ती बाहेरची पानही खावीशी वाटताहेत म्हणत.

                           आपल्याकडे सासवडचा मटार तर इथे सासपोलचा मटार! इतका गोड आणि इतका चविष्ट की बसल्या बैठकीत एखादा किलो नुसताच खाऊन संपायचा! सासपोल हे त्यामानानी कमी उंचीवर आणि कमी थंड गाव त्यामुळे गावावर पीच जर्दाळूंची ही खैरात असायची. दूरदरासच्या बटालिक किंवा तुरतुकचे जर्दाळू तर इतके गरदार असायचे की ह्या जर्दाळूंवर कोणीही फिदा होईल. प्रवीण बटालिकच्या पोस्टवर असलेल्या ऑफिस् च्या लोकांना भेटायला गेला होता. संध्याकाळ झाली. ऑफिसचं कामही पूर्ण झालं. इतक्या लांबवर साहेब आले, त्यांना भेटायला, गप्पा मारायला त्यांनी गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला म्हणजे डॉक्टरना आमंत्रण दिलं होतं. वीज बटालिकपर्यंत पोचली नव्हती. मिणमिणत्या केरोसीनच्या दिव्याच्या उजेडात डॉक्टरसाहेब आणि प्रवीण गप्पा मारत बसले असतांना त्यांच्यासमोर ऑफिस् च्या लोकांनी थाळीभरून जर्दाळू आणून ठेवले. गप्पा मारता मारता मोठ्ठी थाळीभरून जर्दाळू कसे संपले हे दोघांनाही कळलं नाही. तुरतुकच्या  उंच उंच डोंगरांवर असलेला काळा खडकही वैशिष्ट्यपूर्ण होता. त्यावर हे जर्दाळू सहज सुकत. अशा नैसर्गिक सुकलेल्या जर्दाळूची सर डाऊनला मिळणार्‍या जर्दाळूंना कधीही येणार नाही. जुलैच्या दिल्लीच्या भीषण उन्हाळ्यात लेहून कोणाला दिल्लीवारी करायची वेळ आली तर आपल्या लाडक्या आवडत्यांसाठी नजराणा म्हणून सासपोलचा मटार लेचे प्लॉवर,कोबी, तुरतुकचे जर्दाळू हमखास विमानातून दिल्लीसफर करायचे.  दिल्लीच्या विमानतळावर सिक्युरिटिवाल्यांनी अडवलं तर मात्र एवढ्यामोठ्या कोबीच्या आत काही दडवलं नाही हे सिद्ध करण्यासाठी तेथेच त्या कोबीचा अफजलखान किंवा हिरण्यकश्यपू व्हायचा.

---------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

 

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -