22 राष्ट्रपतींची ले भेट -

 

22 राष्ट्रपतींची ले भेट -

                            आम्ही ले ला असतांना माननीय वेंकटरामन् हे राष्ट्रपती होते. पूर्वी ते भारताचे संरक्षणमंत्रीही होते. ले बरोबरच्या त्यांच्या ह्या जुन्या नात्यामुळे त्यांना ले चा चांगलाच परिचयही होता आणि आत्मीयताही. आणि म्हणूनच माननीय राष्ट्रपती वेंकटरामन् सपत्नीक ले भेटीसाठी येणार होते. कोणी येणार म्हटलं की ले मधे उत्साहाचं वारं वहायला लागे मग राष्ट्रपती येणार म्हटल्यावर तर अनेक मनसुबे रचले जाऊ लागले. राष्ट्रपती येणार म्हटल्यावर माननीय राज्यपाल ग्यारी सक्सेना आणि त्यांच्या पत्नी राष्ट्रपतींच्या स्वागताला येणार हे ठरलेलच होतं. राज्यपाल येणार म्हटल्यावर श्रीनगरहून आर्मीचे कोअर कमांडर (C in C) यायलाच पाहिजेत. राष्ट्रपतीमहोदय येणार म्हटल्यावर प्रोटोकॉलच्या लिस्टमधे एकाला धरून एक अशी बरीच नावं येत होती.  Brothers Grimm  च्या golden goose गोष्टीमधे डमी या मुलाला त्याच्या चांगलं वागण्याबद्दल मिळालेल्या सोनेरी बदकाला जो कोणी हात लावी तो त्यालाच चिकटून बसे. त्या चिकटलेल्या आपल्या आप्त स्वकीयाला त्याच्या पासून दूर करण्यासाठी ओढायचा जरी प्रयत्न केला तर तो नवा माणूस पहिल्याला चिकटून बसे. त्याप्रमाणे माननीय राष्ट्रपतिमहोदय येणार म्हटल्यावर एकामुळे दुसरा दुसर्‍याला लागून तिसरा अशी होता होता  लांबच लांब माणसांची यादी तयार झाली. त्या महत्त्वाच्या रांगेत अर्थात प्रवीणचं नाव होतच ! आणि माझी गाड्याबरोबरची नळ्याची यात्रा होणार असली तरी मला चालणार होतं. हाराच्या सोबत दोरा जरी देवाला वाहिला गेला तरी दोर्‍याचं ही  सगळ्या फुलांना एकत्र आणण्याचं महत्त्व असतं, तसच श्रीं बरोबर सौं च ही सगळ्या समारंभाचं सूत्र सांभाळायचं एक महत्त्वाचं काम असतं.

 

                    जम्मू काश्मीर राज्याच्या वतीने राज्यपालांनी राष्ट्रपतींना  एक छानसं जेवण द्यायचं ही ठरलं. डेप्युटि कमिशनर वर्गिस आणि राज्यपालांच्या पत्नीने बेतही ठरवला. पण अर्थात् हा सारा बेत बाकीच्यांसाठीच होता. राष्ट्रपती अतिशय साधं जेवण जेवतात. आणि त्यांच्या दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे फक्त इडली सांबार च खातात असा राष्ट्रपती भवनातून निरोप आला होता. ही इथली सर्वात अवघड गोष्ट होती. त्यासाठी लागणारे तांदूळ एकवेळ मिळाले असते पण उडीद डाळ? बरे एअर फोर्सच्या लोकांनी तीही डाऊनहून आणून दिली तरी दाक्षिणात्य पद्धतीने रगड्यात  ईडलीचं पिठ बनवणार कसं- - बनवलच तर ते फुगणार कसं? तेंव्हा रेडिमेड इडलीपिठाचा जमाना नव्हता. प्रत्येक पायरीवर एक संकट बेत चुकविण्यासाठीच हसत हात बसलं होतं. राष्ट्रपती ज्याचा आस्वाद घेतील असा एक तरी स्थानिक पदार्थ हवाच असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण राष्ट्रपती बाकी काहीही पदार्थ खाणार नाहीत म्हटल्यावर गाडी कहावा का गुरगुर चहा ह्यावर आली. आता मात्र हा प्रश्न काश्मीर विरुद्ध लडाख असा सोडवला जाऊन गुरगुर चहात फारच अमूल बटर आणि मीठ असतं ह्या कारणासाठी गुरगुर चहा रद्द झाला. कहावाचं रम्य चित्र आमच्या डोळ्यासमोर होतं.

                             सुंदर टेबल मांडलं गेलं. काश्मिरी कशिदा असलेला सुरेख टेबलक्लॉथ त्या भल्या मोठ्या लंबगोल टेबलावर शोभत होता. सजावटीसाठी राज्यपाल श्रीनगरच्या त्यांच्या बागेतील खास काश्मीरचे गुलाब घेऊन आले होते. नजर ठरणार नाही असे ते गुलाब आणि त्यांचे रंग होते. अत्युत्तम क्रोकरी, चांदीचे काटे, चमचे , टेबलावर प्रत्येक  खुर्चीपुढे प्रत्येकाच्या नावाच्या सोनेरी अक्षरातील छोट्या पाट्या मांडण्यात आल्या होत्या. खूप दिवसांनी चांगल्या साड्या आणि शालींना उजाळा मिळणार होता. काश्मीरच्या पश्मिना तूश शाली झुळझुळत सुळसुळत होत्या. आता नजरेनेच पश्मिना आणि तुशचा उंची पणा मला आजमावता यायला लागला होता. ह्या काश्मिरी मुलायम शाली तळहातावर घेऊन त्यावर कडेनी हळूच फुंकर घातली की त्यांच्यावर उमटणार्‍या लयबद्ध लाटा  या शालींचा उंचीपणा ठरवतात. त्यावरचा कशिदा,  त्याच्या अनोख्या रंगसंगती आणि भरगच्चपणा हा त्यांच्या किमतीचा दुसरा भाग. काश्मिरी पंडितांच्या लग्नात मुलीला पश्मिना किंवा तुशची कशिदाकारी असलेली साडी माहेरहून दिली जाते. आपल्या बनारसी जरतारी शालूंसासारखी! आणि ती परंपरागत आईकडून मुलीकडे सरकत जाते. राष्ट्रपतिंच्या शेजारी बसलेल्या राज्यपालांच्या पत्नीच्या बोटात बोराएवढा मोती सगळ्यांच्या नजरा वेधून घेत होता. शेजारी बसलेल्या जनरल-पत्नींना न राहवून त्यांनी मोत्याची चौकशी केली. तो त्यांना बेल्जियम भेटीसाठी गेले असतांना त्या सरकारकडून भेट मिळाला होता. “आपण विविध देशांना भेटी दिल्यामुळे अशा अनेक दुर्मिळ आणि उंची गोष्टी आपल्याकडे जमा झाल्या असतील नाही का?” जनरल पत्नीने विचारलेल्या ह्या प्रश्नाला अर्ध्यातच थांबवून राज्यपालपत्नी म्हणाल्या “छे छे आपण आपल्या देशातर्फे दुसर्‍या देशात गेल्यावर दुसर्‍या देशांकडून मिळणार्‍या सर्व किमती गोष्टी ह्या भारत सरकारच्या मालकीच्या असतात. आणि त्या भारताच्याच तोशखान्यात जमा होतात. पण हो एखादी वस्तु तुम्हाला आवडली तर त्यांचं योग्य मूल्याकन करून तेवढे पैसे भरून एखाद्याला ती विकतही घेता येते”.

                                  माझ्या शेजारी एअरफोर्सचे मुख्य बसले होते. त्यांच्याकडून वेगवेगळ्याप्रकारची विमानं, भारत पाक युद्धाच्यावेळी वायुदलाची कामगिरी, ले ला विमान आणतांना येणारे धोके ह्या अनेक गोष्टींबद्दल मला माहिती मिळत होती. जेवतांना कहावाचा रंग पाहून मात्र मला जरा गडबड आहे हे जाणवत होतं. आणि माझ्या शेजारी बसलेले वायुदलप्रमुखही हसत हसत मला सारखा कहावा पिण्याचा आग्रह करत होते. शेवटी तो सुंदर कप ओठाला लावत कहाव्यासोबत वर तरंगणारी केशरकाडी हळूच ओठातून तोंडात ओढून घेत मी म्हटलं ‘छान आहे कहावा’. लहान असतांना पानातलं काही टाकायचं नाही आणि बाहेर जेवायला गेल्यावर कशाला नावं ठेवायची नाहीत हे संस्कार इतके जोरदार झाले होते की  ‘काय कहावा आहे का गरम पाणी’  हे  शब्द ओठावर काय मनातही आले नाहीत. ‘उदर भरण नोहे’ असं म्हणतांनाच रामदासस्वामींनी त्यांच्या एका भक्ताकडे कडू भोपळ्याची भाजीही कशी छान आहे म्हणत मनापासून खाल्ली एवढंच आठवत होतं. शेवटी हसत हसत माझी भरपूर चेष्टा करत त्यांनी हळूच मला सांगितलं की माननीय राज्यपालांच्या पत्नी आणि मिसेस कलेक्टर यांच्यात कहावात साखर नको, बदाम नको, हे नको ते नको असा बराच खल होऊन राष्ट्रपतींना चहाचा स्वाद आवडला नाही तर असं नको म्हणून कहावाच्या चहापत्तीलाही रजा देण्यात आली होती . शेवटी गरम पाण्यात नुसती केशराची काडी घालूनच द्यायची ठरली.  नंतर हसत हसत त्यांनी सांगीतलं मिसेस दीक्षित उद्या मात्र राष्ट्रपतींना आर्मि आणि एअरफोर्सतर्फे जेवण आहे बर का! तुम्हाला निमंत्रण आहेच तेंव्हा उद्या मात्र आम्ही हा असा नाही - -खास काश्मीरचा बदाम केशर युक्त ‘कहावा असलेला’ कहावा देणार आहोत.

                           जेवण संपवून आम्ही सर्वजण बाहेरच्या हॉलमधे बसलो. राष्ट्रपतींचा उत्साह त्याही वयात सर्वांना आश्चर्य वाटेल असाच होता. आमच्या सर्वांबरोबर बोलतांनाही मोकळेपणानी हसत मनमुराद गप्पा मारतांना आम्ही जणू एका परिवारातीलच आहोत असं वाटत होतं. इथल्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची त्यांची लहान मुलासारखी उत्सुकता, राष्ट्रपती म्हणून अनेक देशात गेलेले असतांना तिथले किस्से,- - - खरतर गप्पांची एक सुंदरशी मैफिलच जमली. राष्ट्रपती बालीला गेले असतांना त्यांच्यावर आलेला एक गमतीदार प्रसंगही त्यांनी सांगितला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आणि प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं जेवणं. हा रोचक प्रकार असतो. बालीला जेवणाआधी तिथल्या जेवणाची डेलिकसी म्हणून माननीय राष्ट्रपतींना खास घोड्याचं दूध ऑफर करण्यात आलं. कोणाचं मन मोडू नये म्हणून उपचारादाखल ग्लास हातात घेणं तर आवश्यकच होतं पण दर वेळी ग्लास तोंडाजवळ नेला की त्याच्या उग्र वासानी त्यांना तिथेच मळमळून येई. परत सगळ्यांकडे हसत हसत बघत ग्लास ते खाली घेत. राष्ट्रपतीमहोदय सांगत होते ‘आधीच मला दूध आवडत नाही त्यात घोड्याचं दूध ही कल्पनाच मला असह्य होती.’ शेवटी कोणाचं लक्ष  नाही हे पाहून पटकन त्यांनी तो ग्लास सोफ्याच्या मागे कोपर्‍यात सरकवून दिला. गप्पा रंगात आलेल्या असतांनाच माननीय राष्ट्रपतींच्या A.D.C. ने येऊन जेवणाची वेळ संपली आता निघायला हवं ह्याची सूचना माननीय राष्टपतींना दिली. “थोड्यावेळात निघूच या” असं राष्ट्रपतीजींनी सांगितल्यावर परत तो त्याच्या मागे जाऊन आदबीने पुतळ्यासारखा उभा राहिला. पंधरा मिनिटं चुटकीसरशी संपली आणि परत तसंचं घडलं. A.D.C. ने येऊन वेळ संपली आता निघायला हवं ह्याची सूचना राष्टपतीजींना दिली. थोड्यावेळात निघूच या असं राष्ट्रपतीमहोदयांनी सांगितल्यावर परत तो त्याच्या मागे जाऊन आदबीने पुतळ्यासारखा उभा राहिला. अजून पाच मिनिटांनी मात्र, A.D.C. ने, ‘आता झोपायची वेळ झाली’ असा राष्ट्रपतिमहोदयांना  पुढे येऊन पुन्हा आदबीनी इशारा दिला. आता आपल्याला निघायलाच पाहिजे असा तो निर्वाणीचा इशारा होता . आता मात्र पुतळ्यासारखं मागे न उभं राहता आदबीनं झुकून ‘इकडून - -इकडून’ असा संस्कृत नाटकात राजाला जसा रस्ता दाखवत राजमहालात नेतात, तसा आदबीने हात करून तो उभा रहीला. राष्ट्रपतिमहोदयांना थांबता येणं शक्य नव्हतं. कुठला तरी किस्सा सांगण्याच्या ऐन रंगात आलेले राष्ट्रपती महोदय संभाषणातील वाक्यही अर्धवट सोडून उठले. किस्सा तसाच राहून गेला. घड्याळाच्या काट्याबरोबर चाललेला त्यांचा दिनक्रम, आणि घड्याळाच्या दोन लहानशा काट्यांमधे सापडलेलं आयुष्य बाकीच्यांना कितीही हेवा वाटेल असं असलं तरी किती कडक शिस्तीचं आहे हे पाहिलं की मनातील हेव्याची जागा आदराने घेतली जाईल. तरीही त्यांची फोटोग्राफीची आवड, सर्वांशी उत्साहा उत्साहाने बोलणं, तिथले प्रश्न समजाऊन घेणं, सर्वच स्फूर्ती देणारं वाटत होतं.

        श्री. बुटासिंग हे तेंव्हा केंद्रिय गृहमंत्री होते. त्यांची ले भेट काही कारणांनी प्रवीणच्या चांगलीच लक्षात राहिली. बुटासिंगजींना भेटून प्रवीण घरी परत आला तो हसत हसतच. कितीतरी वेळाने त्याने सांगीतल की, -

                       बुटसिंगजी ले ला पोचले तेंव्हा त्यांच्या स्वागताला नेहमी प्रमाणे आर्मी एअरफोर्स च्या मुख्यांसोबत इतरही सर्व युनिटप्रमुख उपस्थित होते. प्रवीणही होता. बुटासिंगजींनी खोलीत जाण्यापूर्वी प्रवीणला आत खोलीत यायला सांगितलं. प्रवीण एकटाच आत गेला. बाकीचे सारे महारथी बाहेरच ताटकळत उभे होते. त्यांनी प्रवीणबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या ``हे बघ! तुला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो.'' बुटासिंगजी म्हणाले. ``बाहेर कुठे जायचं असलं की पोटभर खाऊन बाहेर पडायचं. कधी उपाशीपोटी बाहेर जायचं नाही त्यामुळे तुम्ही शांत आणि आनंदात राहू शकता. कोणी कितीही रागवलेले असले तरी तुमचं डोकं शांत राहतं.'' बुटासिंगजींनी आनंदी रहायचा एक महत्वाचा मंत्र प्रवीणला दिला. जो आम्ही आजही पाळतो आणि खूष राहतो. पण खरी गम्मत पुढे होती. अर्धातास गप्पा मारून प्रवीण हसत हसत  बाहेर आला तेंव्हा सर्व वरिष्ठांचे चेहरे मात्र ऑपरेशन थिएटर बाहेर उभ्या असलेल्या नातेवाईकांसारखे होते. सर्वांनी त्याला  घेरून इतका वेळ आतमधे कुठल्या गहन विषयावर चर्चा झाली ते विचारलं. ``आम्ही फक्त गप्पा मारल्या हे वारंवार प्रवीण जेवढं सगळ्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करत होता होता तेवढं त्यांना प्रवीण आणि गृहमंत्र्यांमधे काही गुप्त गोष्टींवर खूपच खलबतं झाली असल्याचा जास्त जास्तच संशय वाढत राहिला. त्यादिवशी गृहमंत्री बाकी कोणालाही भेटले नाहीत. आणि त्या छोट्याशा गावात गृहमंत्री आणि प्रवीणभेट एक चर्चेचा विषय ठरला.

                   भाषेचा धागा आपोआप एक आपलेपणाचं नातं निर्माण करतो. तेंव्हा माननीय शरद पवारजी संरक्षणमंत्री होते. शरद पवारजी  सहपरिवार ले भेटीला आले होते. ते आर्मी हेडक्वार्टरच्या गेस्टहाउस मधे उतरले होते. तेंव्हाही लेफ्टनंट जनरलना बाहेर तिष्ठत ठेऊन प्रवीणला आधी भेटल्यामुळे प्रवीण भोवतालचं संशयाचं धुकं अजुन गडद होत गेलं. त्यात अजून कॅबिनेट सचिव बी. जी. देशमुख आमच्या घरी जेवायला आल्याचं कळल्यावर मात्र लॅमडॉन शाळेत शिकवणारी माझी बंगाली मैत्रीण चांगलीच नाराज झाली. `` मेरे हसबंड आर्मीमे जॉईन होनेकी बजाय IAS या IPS होते तो आज यहाँ जैसे सड रहे हैं वैसे सडते नही ।'' असा विशाद तिने व्यक्त केला. खरतर तिचे पतीही देशासाठी फार मोलाचच काम करत होते. पण लडाखच्या विजनवासामुळे कोणाचं एकटेपण कशा रितीने बाहेर पडेल हे सांगणं अशक्य होतं. अशावेळेला आपण शांत राहणंच आवश्यक असे आणि पर्यायानी श्री बुटासिंगजींच्या उपदेशाचं पालनही.

-----------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -