23 लडाख दर्शन

 

   23 लडाख दर्शन                   

 हेच पुढचे चार-पाच महिने होते जेंव्हा ले सोडून बाकी लद्दाख परिक्षेत्रात फिरता येणार होतं. चीनमधून सिंधु जिथे भारतात प्रवेश करते त्या देमचोक पासून जिथे ती पाकिस्तानात जाते त्या बटालिक पर्यंतचा प्रवास  प्रवीणला करायचा होता. काही ठिकाणी मलाही त्याच्या बरोबर जाता येणार होतं. दूरवरच्या पोस्टवर नियुक्त असलेल्या  आमच्या माणसांना भेटायला जाणं ही एक पर्वणीच असायची. जातांना त्यांना खाऊ, बिस्किटस्, लोणची, अशा गिफ्टस् आम्ही घेऊन जात असू. सर्व दूरदूरच्या पोस्टवरील माणसं जवळचे नातेवाईक यावेत इतक्या उत्सुकतेनी आमची वाट बघत असतं. खरतर I.P.S. Acadamy मधे वारंवार वापरली जाणारी एक म्हण आमच्याकडेही प्रचलित झाली होती ‘साहेबाच्या पुढे आणि घोड्याच्या मागे कधीही जाऊ नये.’ इथे मात्र exception proves the rule  असं म्हणायला काही हरकत नव्हती. त्यांचा हा आनंद आम्हालाही फार मोठा वाटे. आमच्या ह्या छोट्या मोठ्या भेटवस्तूंनी त्यांचे चेहेरे आनंदाने फुलून येत. अर्थात् त्यांचं पूर्ण वर्षाचं रेशन, केरोसीन, डिझेल आणि तिथे पाळलेल्या प्राण्यांचा दाणा, पाणी, वैरण हे त्यांना वेगळं पोचवलं जाईच. इथे गाड्यांसोबत याक, घोडे, गाढवं आणि त्यांच्या संरक्षणाला कुत्री पाळली जात. गाडयांइतकच ह्या प्राण्यांचं महत्त्व इथे अनन्यसाधारणच आहे. जिथे गाडी जाऊ शकणार नाही तिथे हे याक, गाढवं आणि खेचरं सहज जाऊ शकत. दुर्गम भागात माणसं आणि सामान वहातूक ह्याच प्राण्यांवर अवलंबून असे.

                  ह्या प्राण्यांचं महत्त्व सांगणारी एक गमतीदार गोष्ट बटालिकच्या एका लडाखी डॉक्टरनेच प्रवीणला सांगितली. अतीशय दुर्गम भागात खेचरांच्या मदतीने सामान पोचवणारा एक माणूस एकदा त्या लडाखी डॉक्टरांकडे पेशंट म्हणून आला. डॉक्टरांनी त्याला त्याच्या मुलाला चांगलं शिकवून शहाणं करण्याचा सल्ला दिला. त्यावर त्याने डॉक्टरांना विचारलं- “डॉक्टरले तुम्हाला शाळेनंतर डॉक्टर व्हायला किती वर्ष लागली”? “दहा वर्ष” - डॉक्टर. “म्हणजे बारा अन् दहा अशी बावीस वर्ष तुम्ही घालवली आणि मग डॉक्टर झाला. परत शिकायला किती पैसा घालवला तो वेगळाच! माझ्याकडे आज चार गाढवं आहेत. मी दिवसातून दोन फेर्‍या करतो. मला प्रत्येक फेरीला प्रत्येक गाढवामागे 200 रुपये मिळतात. दिवसाला 1600 रुपये मिळतात महिन्याला 48000! शिवाय दरवर्षी माझ्याकडची गाढवांची संख्याही वाढतच जाते.(25-26 वर्षांपूर्वी उच्च पगारही  दहावीस हजारातच आटपत होते.) आपण दोघं सारख्याच वयाचे आहोत. तुमच्यासारखी  माझी बावीस वर्षही वाया गेली नाहीत. आज मी तुमच्यापेक्षा श्रीमंत आहे.” अर्थात डॉक्टरांनी त्याला जेंव्हा सांगितलं की “बाबारे तू आजारी पडलास तर इंजेक्शनमधून पैसा शरीरात ढकलून तू काही बरा होणार नाहीस. त्यासाठी डॉक्टर होऊन आजारी माणसाला औषधच द्यायला लागतं”. तेंव्हा मात्र त्याला शिक्षणाचं महत्त्व पटलं. असो सांगायचं एवढंच होतं की माणसांना भेटणं जेवढं आवश्यक असे तेवढच ह्या Live stock ला भेटणं.

    23 सीमेवर

                   देशांना सीमा असतात. पण निसर्गाला त्या मान्य असतातच असं नाही. हिमालयाला तर नाहीच नाही. उद्या कोणी समुद्रात भिंत बांधून देशाच्या सीमा घडवायचं ठरवलं तर ते जेवढं पोरकटपणाचं असेल तेवढंच हिमालयात कुंपण घालणं . त्यामुळे नदीचा हा किनारा भारतात तर दुसरा किनारा चीनमधे अशाच  सीमा ठरतात. ह्या नद्या थंडीत गोठल्या की नद्याही देशांचं, माणसांचं वेगळेपण अमान्य करतात, ह्या गोठलेल्या नद्यांमुळे एक पक्का रस्ताच तयार होतो. त्याला चादर रस्ता म्हणतात. ह्या पक्या गोठलेल्या रस्त्यांवरून ट्रकसुद्धा इकडे तिकडे जाऊ शकतात. लडाखचं हवामान वाईट असलं तरी हा भूभाग बारा महिने इतर कोणत्या ना कोणत्या महत्वाच्या भूखंडाला जोडलेला असतो. लडाख कधीही एकाकी उरत नाही. चिनी ड्रगॉनच्या चित्रांचे सुंदर कप, थर्मास,नूडल्स बनवायची हँडी मशिन्स अशा असंख्य चिनी गोष्टी ले च्या बाजारापासून लद्दाखच्या कानाकोपर्‍यात सहज उपलब्ध असायचं कारण समोरच्या निसर्गात दडलं होतं.  सीमेवर असलेल्या कोयुल या गावाला भेटलेल्या एका माणसाला प्रवीणनी सहजच विचारलं की “तुम्हाला भारतात रहायला आवडेल का चीन मधे?” त्यानी शांतपणे उत्तर दिलं “जो देश आम्हाला खायला देईल त्या देशात”.  विस्तीर्ण पसरलेल्या ओसाडीमधे त्याचं सहज बोलणं आम्हाला अवाक् करून गेलं. आपल्या छानशा घरात सर्व सुखसोयी उपभोगत देशप्रेमानी उर भरून येणं हे जितकं नैसर्गिक तेवढंच त्याचंही बोलणं नैसर्गिक आहे हे पटायला वेळ लागला. अनेक गृहीत धरलेल्या गोष्टी डळमळित व्हायला लागल्या आणि नव्या विचारांच्या भक्कम पायावर  मन स्थिर व्हायला लागलं. देशप्रेम निर्माण व्हायला काय काय गोष्टींची जरुरी लागते ह्याचा विचार करायला लागले. जगण्यासाठी पुरेसं अन्न हे काही  प्रमाणात खरं होत. पण सार्‍या भारतीयांचं प्रेम मिळणं, त्यांचा सहवास मिळणं, तुम्ही आमचे आहात, आम्हाला तुमची काळजी आहे, आम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे, तुमच्यासाठी आमचा प्रत्येक घास अडतो हे आपल्याकडूनही कळायची जरुर आहे का ? आपल्या गावांमधे चाललेल्या प्रचंड सुधारणांचा थोडासा हिस्सा तरी इकडे पोचायला पाहिजे का? सुधारणांपासून वंचित राहून गेलेल्या या आपल्या बांधवांना मनाने आपल्या घरी आणण्यासाठी आपण काय करु शकतो? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतला विचारायला पहिजे का?  देमचोकला आम्ही पोचलो तेंव्हा साहेबांच्या आगमनाप्रीत्यर्थ राष्ट्रध्वज लावण्यात आला आणि थोड्यावेळात तो काढूनही घेण्यात आला. इथल्या जोरदार वार्‍यात तो एक दिवस काय एक तासही टिकणं शक्य नव्हतं.

--------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -