24 एकांत-

 

24 एकांत-                             

                आम्ही चुशूलला जात होतो. चोहीकडच्या निर्मनुष्य भागात आर्मीच्या काही क्वार्टर्स दिसत होत्या. तिथे कोणी रहात असल्याची वर्दळ, हालचाल काहीच दिसत नव्हती. ग्यालपोला विचारायच्या आधीच ग्यालपो म्हणाला “सर ह्या क्वार्टर्समधे आता कोणी रहात नाही. 1962 च्या चीन युद्धानंतर त्या आर्मीने सोडून दिल्या आहेत. रात्री गाड्या इथून जायलाही घाबरतात. रात्री इथे युद्धाचे आवाज ऐकू येतात म्हणे. मेजर शैतानसिंग इथेच शहीद झाले.” सगळीकडे फक्त भीषण शांतताच होती. वादळापूर्वीही शांतता असते आणि वादळानंतरही. वादळानंतरची शांतता मात्र वादळाने घातलेल्या थैमानाच्या खुणा अंगावर घेऊनच वावरत असते. त्या शांततेत जास्त भयानकता असते.


               एखाद्या शब्दाच्या अर्थाची घनता, गहनता, अगाधता, खोली, उंची, त्याच्या सोबतीला असलेल्या आजुबाजूच्या शब्दांवर अवलंबून असते. लडाख ले ह्या शब्दांसोबत येणारे साधे साधे वाटणारे रस्ता, खिंड, डोंगर, दरी, एअरपोर्ट, थंडी हे साधे साधे शब्दसुद्धा जागतिक परमोच्च परिमाणं ठरवतात. गाव तिथे एसटी इतकं सोप्पं गणित न राहता वाहन जेमतेम जाऊ शकेल असा रस्ता आणि उरात धडकी भरवणारी वळणं दिसायला लागतात. आणि असा रस्ता बनविणार्‍या लोकांची नावं थेट गिनीज बुक मधेच जाऊन बसतात. जगातील सर्वात उंच वाहनरस्ता, जगातील सर्वात ऊंच खिंड. जगातील सर्वात उंच युद्धभूमि, जगातील सर्वात उंच पर्वत रांग अशा भव्यतेची अत्युच्च परिमाणं ठरवणार्‍या पदव्या, किंवा बिरुदं त्या शब्दांच्या आगेमागे आदबीने झुलत उभी राहतात.  तसाच हा शब्द- एकांत !

             एखाद्या राजाने टाळी वाजवून एकांत म्हटलं तर त्याच्या आजुबाजूच्या खुशमस्कर्‍यांना वाटेला लावून काही अत्यावश्यक निर्णय घेण्यासाठी, चिंतनासाठी मेंदूला आवश्यक असलेला सर्जनशील एकटेपणा अभिप्रेत असतो.                                                                 कै. राम गणेश गडकरी यांच्या घराबाहेर कित्येक वेळा ‘गडकरी कामात आहेत’ अशी पाटी लावलेली असे आणि त्यावेळी गडकरी मात्र त्यांच्या खिडकीत शांतपणे बसलेले असत. त्यांना तसं बसलेलं पाहून तेथून जाणार्‍या एका माणसाने विचारलं. “हे काय तुम्ही तर इथे काही न करता नुसते बसला आहात. बाहेर पाटी मात्र तुम्ही कामात आहात अशी आहे”.  त्यावर गडकरी उत्तरले. “जेंव्हा मी शांत बसलेला असतो तेंव्हाच मी खूप कामात असतो”. असा लेखक शब्दासमवेत येणारा एकांत हा शब्द मनात चाललेल्या आवर्तनांना शब्दरूप देणारा ठरतो.

             लडाख या शब्दासोबत एकांत हा शब्द आला की त्याच्यातील हवेहवेसेपण संपून सर्वत्र भीषणताच भरून राहते. अगदी बेंबीच्या देठापासून केलेला आक्रोशही कृष्णविवरात लुप्त झाल्यासारखा लुप्त होतो. आजुबाजूला कोणी नाही म्हणजे खरोखरच कोणीही नाही ही परिस्थिती अनुभवल्यावर भीतीचे भयाण आणि भेसूर चेहरे तुमच्या डोळ्यासमोर नाचायला लागतात. अर्जुनाने विश्वरूप दर्शन अनुभवल्यावर भयाने डोळे मिटले तर त्याला स्व:मधेही तेच विश्वरूप दिसत राहिलं. तसंच इथल्या एकाकीपणानी डोळे झाकावे तरी भय इथले संपत नाही अशी भयाकुल अवस्था होते. अनेक वेळा अशा दुर्गम एकाकी पोस्टवर पाठविल्यावर माणसं मानसिक संतुलन गमावून बसतात. त्यामुळे अनेक दुर्गम भागातील भारतीय ठाणी बंद करावी लागली आहेत. अशा ठिकाणी एखादा माणूस पाहिल्यावर होणारा प्रचंड आनंद आणि चेहर्‍यावर पसरणारं हसू इतकं मनापासून असत की जणू जिवाशिवाची भेट! अशा ह्या दुःसह एकांतात समोरच्या रिकाम्या बरॅक्स मेजर शैतानसिंगाच्या पराक्रमाचा इतिहास सांगत होत्या.

-----------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -