25 मेजर शैतानसिंग

 

25 मेजर शैतानसिंग

                     महाराष्ट्रातल्या एका पावनखिंडीचा इतिहास आपल्याला माहीत असेल पण चुशुलच्या रिझांगला ह्या दुसर्‍या पावनखिंडीत प्राणांची बाजी लावून लढलेल्या, आणि शत्रूला कर्दनकाळ वाटलेल्या हया शैतानसिंहाची आठवणही तेवढीच स्फुरण देणारी आहे. जिथे मेजर शैतानसिंगांनी आणि त्यांच्या साथीदारांनी चिन्यांशी झुंजत आपले देह ठेवले त्या जागी निसर्ग मूग गिळून आजही गप्पच बसलेला आहे. त्याची ती शांतता, त्याने पुकारलेला असहकार चिन्यांच्या मुंगळ्यांच्या रांगांसारख्या अव्याहत येणाऱया सैन्यापेक्षा कितीतरीपट महाभयानक आहे. आमचेच निःश्वास आम्हाला ऐकू येत होते. मेजर शैतानसिंगच्या तुकडीचे ओस पडलेले बंकर्स दाखवत ग्यालपोने जे सांगितलं तेच आमच्या ड्रायव्हरने पलझोरनेही परत सांगितलं. आजसुद्धा रात्री इथे सैनिकांचे लढाईचे आवाज येतात म्हणून इथे कोणी रहात नाही. खरंच देह पडला तरी अखेरचा  चीनी सैनीक पडेपर्यंत झुंज देण्याचा निर्धारानी  अजुनही त्या   हुतात्म्यांचे आत्मे तिथे लढायला सज्ज असतील का? का तिथल्या भयावह संग्रामाच्या रणधुमाळीचे आवाज येण्यापेक्षा आवाजालाही भेदून गप्प बसवणारी इथली शांतताच मनाला मोठ्यांदा किंचाळायला लावत असेल?- - - माहित नाही.

                    18 नोव्हेंबर 1962! हिंदी चीनी भाई भाईच्या घोषणांना केराची टोपली दाखवून चिन्यांनी भारताचा विश्वासघात केला तो दिवस. भारतमातेच्या हिम धवल अंकावर तिच्याच पुत्रांच लालभडक रक्त ओघळलं तो दिवस.                                

           लडाखमधील चुशुल व्हॅलीच्या दक्षिणपूर्व सीमेवर तेंव्हा 13 कुमाऊ रजिमेंट (Kumaon Regiment) भारताच्या सरहद्दीचं रक्षण करत होती. मेजर शैतानसिंगांची सी. कंपनी रिझांगला ह्या 5000 मीटर उंचीवरील खिंडीमधे नेमली होती. मेजर शैतानसिंगांच्या कंपनीची पाच पथकं आजुबाजूच्या सर्व सुनसान परिसरात चिनी हालचालीवर लक्ष ठेऊन होती. 17 नोव्हेंबरची काळरात्र संपून दिवस जणू उजाडलाच नाही. बर्फाळ वार्‍यांचा पिंगा शरीराच्या सार्‍या संवेदना गोठवून टाकीत होता. सावरीच्या शेंगा तडकून चमकदार पांढर्‍या म्हातार्‍या हवेवर तरंगत तरंगत खाली याव्यात, रानोमाळ पसराव्यात, किंवा हवेतल्या हवेत ससाण्याने कपोताची शिकार करतांना त्यांच्या पांढर्‍या शुभ्र पिसांचा सडा मातीत मिळण्यासाठी खाली तरंगत यावा तसा ढग उकलून बर्फ खाली सांडत होता.

                     ह्या ओसाडीत आधीच पाऊस कमी पडतो. आणि जो पडतो तो डोंगरांवरून नाले ओहोळांमधून कधीच वाहून जातो. साधारण दोन डोंगर जिथे जोडलेले असतात तिथल्या घळीत हे सारे ओहोळ नाले एकत्र येतात. आणि ही घळ पाऊस पडला किंवा बर्फ वितळलं की थोडे दिवस पाण्याने भरून जाते. बाकी सारे महिने ती कोरडीच असते. पण पाण्याच्या राहिलेल्या अवशेषावर काही लहानमोठी झाडं त्याच्या आश्रयाने वाढत राहतात. ह्या कोरड्या नाल्यांना किंवा घळींना इथे नुल्ल्हा म्हटलं जातं. बाकीवेळी नुल्ल्हांचा डोंगरांवरून खाली उतरण्याचा मार्गदर्शक रस्ता म्हणूनही उपयोग होतो.

                   फटफटल्याच्या खुणा आकाशात कुठेतरी दिसायला लागल्या आणि दुर्बिणीतून चिन्यांच्या काळ्या आकृत्या - -सावल्या या नुल्ल्हांमधून  पुढे पुढे सरकतांना दिसायला लागल्या. प्लाटुन 7 आणि 8 च्या दिशेने त्या खाली सरकत होत्या. बेसावध भारतीय सेनेला लक्ष करून आपला डाव साधून घ्यायचा त्यांचा इरादा स्पष्टच दिसत होता. जवळ असलेल्या नसलेल्या सर्व शस्त्रसाठ्यानिशी शत्रूला तोंड द्यायला भारतीय तुकड्या सज्ज झाल्या. आता पहाटेचे पाच वाजले. जराजरा अंधुक प्रकाशात हालचालींचा अंदाज यायला लागला आणि दोन्ही प्लाटुननी पुढे सरकणार्‍या शत्रुसैन्यावर गोळीबाराला सुरवात केली. light machine guns, grenades आणि mortars नी नुल्ल्हा मधे प्रेतांचा खच पडला. पण चिनी सैन्याची पथकं मुंगळ्यांसारखी अथक येतच होती. एक पडला तर त्याची जागा घ्यायला दुसरा हजर होता. नाउमेद न होता, मोठमोठ्या शिळांच्या मागे लपत तर कधी प्रेतांच्याच आडोशाने ते पुढे सरकत होते.  संख्याबळाने अतीशय नगण्य असलेल्या भारतीय सेनेवर artillery आणि mortar चा प्रचंड भडिमार करायला त्यांनी सुरवात केली.  साडेतीनशे चिनी सैनिक नुल्ल्हामधून पुढे सरकत होते. ते 90 मीटर अंतरावर येईपर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व शस्त्रांनी भारतीय जवानांनी त्यांच्यावर गोळ्यांची बरसात केली. आणि परत एकदा नुल्ल्हामधे  चेतनाहीन मृत शरीरांचा कचर्‍यासारखा  ढीग पसरला.

               पुढून मारा केला तर आपला निभाव लागणं कठीण आहे हे आत्तापर्यंत शत्रूला समजून चुकलं होतं. त्यांच्या चारशे जणांच्या तुकडीने आठ नंबरच्या प्लटुनवर मागच्या बाजूनी MMG (medium machine gun) चा हल्ला चढवला. त्याचवेळी सव्वाशे चिनी सैनिकांनी प्लाटुन सातवरही मागच्या बाजूने हल्ला चढवला. भारतीय सैन्याकडे असलेल्या 3-inch mortar नेही शत्रुसैन्यातील अनेकांना कंठस्नान घातलं. चिन्यांकडील  उरल्यासुरल्या वीस सैनिकांनी आता भारतीय ठाण्यावर हल्ला चढवला आपलेही उरलेले डझनभर सैनिक पुढे सरसावले; आणि आता आमने सामने युद्धाला प्रारंभ झाला; आणि त्याचवेळी शत्रूची नव्या दमाची नवी तुकडी येऊन दाखल झाली. प्लाटुन सात चारी बाजूंनी घेरलं गेलं. पण जिवात जीव असेपर्यंत आणि शरीरातील शेवटचा रक्ताचा थेंब असे पर्यंत सारे वीर लढत राहिले. प्लाटुन आठ मधेही शेवटची गोळी संपेपर्यंत शेवटचाही सैनिक झुंजला.

                           स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता दोन्ही तुकड्यांची भक्कम व्यूहरचना करून दोन्ही तुकड्यांच्या सैनिकांच्या हृदयात शेवटपर्यंत स्फूर्तिचं स्फुंलिंग चेतवत ठेवणारा शैतानसिंग हा वीर योद्धा सतत एका प्लाटूनकडून दुसर्‍या प्लाटूनकडे जाऊन युद्धासाठी त्याच्या साथीदारांना प्रोत्साहित करत राहिला. इथे अचानक कुमक येणंही शक्य नव्हतं. पुढे वाढून ठेवलेलं भविष्य शैतानसिंगला स्पष्ट दिसत होतं. पण वाघाचा बछडा रणांगण सोडून पळेल काय? वीर अभिमन्यूला  सर्व कौरव रथी-महारथींनी घेरलं. अभिमन्यू प्रचंड थकला होता. घाव अंगावर झेलून त्याचं शरीर क्षीण झालं होतं. पण शेवटी रथाचं चाक हाती घेऊन शत्रूवर धावून गेला. रणांगणात मरण येणारच असेल तर वार पाठीवर झेलण्यापेक्षा छातीवर का नाही झेलू? शैतानसिंग आणि त्याचे  साथीदार शेवटपर्यंत लढत राहिले.  दोन्ही पथकांकडे लक्ष देता देता शैतानसिंग जबरदस्त जखमी झाला. अगदी शेवटच्या क्षणी धारातीर्थी शेवटच्या घटका मोजणाऱया शैतानसिंगाला त्याचे दोन जिवलग साथीदार सुरक्षित जागी उचलून नेत असतांनाच त्यांच्यावर मशिनगन्सचा भडिमार होतांना पाहून मेजर शैतानसिंगला धोका जाणवला. त्याने आपल्या सहकार्‍यांना त्याला तिथेच सोडून जायची आज्ञा दिली. मोठ्या जड अंतकरणाने एका मोठ्या दगडी शिळेच्या आडोशाला पर्वताच्या उतारावर आपल्या स्नेह्याला सोडून सैनिक पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले.  हिमालयाच्या साक्षीने, रिझांगलाच्या कुशीत शैतानसिंगानी आपलादेह ठेवला.  जिथे शैतानसिंगचं रक्त सांडलं ती भूमी पावन झाली. आपल्या 123 कुमाऊ वीरांपैकी 109 जणांना वीरगती प्राप्त झाली. ह्याच्या कितीतरीपट अधिक चिनी सैन्य मारलं गेलं. युद्ध संपल्यानंतर धरतीमातेच्या अंकावर चिर-विश्रांती घेणा र्‍या शैतानसिंगचं शव तिथेच शिळेपाठी सापडलं. लष्करी इतमामात ते विमानाने जोधपूरला नेऊन त्याच्यावर लष्करी इतमामात शेवटची क्रियाकर्मं करण्यात आली. शैतानसिंगांच्या उच्च कोटीच्या नेतृत्वगुणांसाठी आणि रणांगणावर गाजविलेल्या महापराक्रमासाठी मरणोत्तर परमवीरचक्र हा सर्वात मोठा पुस्कार देऊन गौरविण्यात आलं. जराही न डगमगता कर्तव्य बजावत असतांना हा सिंह आपल्याला सोडून गेला. - -बाजी प्रभूंसारखा - -आपल्या सर्वांच्या हृदयात एक अढळस्थान मिळवूनच!

 रिझांगला या दुसर्‍या पावन खिंडीची ही गोष्ट इथे संपली.



---------------------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -