26 लडाखचे अंतरंग
26 लडाखचे अंतरंग
लडाखच्या वाळवंटातला हा प्रवास सिंदबादच्या, गलिव्हरच्या
सर्व गोष्टी खर्या आहेत की काय असं वाटायला लावणारा थरारक नक्कीच! ठिकठिकाणी जमिनीचा
पोत बदलणारा. कधी वाळवंट तर कधी बोरॅक्सनी पांढरी नापीक झालेली जमीन, तर कधी मधेच आडव्या
उभ्या भेगांचं दाट जाळं! किती दिवस ही जमीन
तहानेने व्याकूळ झाली होती कळत नाही. आणि सरसरसर पावसाची मोठ्ठी सर आली. मोठ्ठे मोठ्ठे
टप्पोरे पावसाचे थेंब टप टप टप जमिनीवर उतरायला
लागले. फुलं बरसल्यासारखे! जमिनीवर गडद करवतकाठी कदंब थेंबफुलांची रांगोळी तयार होत
होती. आणि क्षणात पुसली जात होती. पावसाचा मागमूसही मागे न ठेवता. वीसएक मिनिटात पाऊस संपला. जमीन पूर्वीसारखीच दिसत होती- -भेगाळ- -कोरडी -
-तृषार्त. जमिनीची तहान न शमणारी.
ले पासून साधारण दोनशे कि.मी.वर असलेल्या
तुरतुकच्या रस्त्यावर इतके ऊंच डोंगर होते की डोंगरांची उंचच उंच शिखरं बघतांना डोकं
इतकं मागं न्यावं लागे की जणु पाठीला चिकटे आणि त्याच्या जोडीने येणार्या दर्या इतक्या
खोल की हनुवटी छातीला टेकली तरी पूर्ण दिसू नये. बरं हे डोंगर सुद्धा दगडांची भलीमोठी
रास करून ठेवल्यासारखे! मधला एक जरी दगड घसरला तर रासच अंगावर येईल असे वाटणारे! वारा
जरी वहायला लागला तरी वरतून गोफणीतून उडवल्यासारखे दगडगोटे अंगावर येत.
तुरतुक मात्र लेचं नंदनवन म्हणायला लागेल.
तुरतुक हे भारताचं उत्तरतम टोक. 1971च्या युद्धात पाकिस्तानकडून जिंकून घेतलेलं गाव.
पाकिस्तान सीमा जेमतेम सात कि.मी.वर.असेल. प्रभु नावाचा Msc. Maths केलेला अतीशय सक्षम मराठी युवक तिथे मुख्य अधिकारी
म्हणून काम बघत होता. आणि आपल्या सीमेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन होता. त्याच्यातल्या
प्रामाणिकपणा आणि नेतृत्त्वगुणामुळेच प्रवीणने त्याला येथे नेमले होते.
इथले जर्दाळू मधासारखे गोड आणि गरदार असतात. इथे
असलेल्या काळ्याशार दगडांवर ते वाळतातही छान! इथले लोकं वंशाने शिया मुसलमान आहेत.
रेखीव नाकेडोळे असलेले हे लोकं उद्यमशीलही आहेत. त्यांनी बनविलेल्या दगडाच्या कुकरमधे
अन्न 24 तास गरम राहतं; असे तेथील लोक सांगत होते. 2009 पासून हे गाव सर्व भारतीयांना
पर्यटनासाठी खुलं केलं आहे.
बटालिकला जातांना एक खोल घळ ओलांडायला लागते. ह्या
घळीमधेच डोंगरावरून इतका प्रचंड मोठा धोंडा येऊन अडकला आहे की त्याने ह्या घळीत एक
नैसर्गिक पूलच तयार केला आहे. त्याच्यावरून
आर्मीचे शक्तिमान ट्रकही लीलया पार होत. इथल्याही लोकांना त्यांच्या नाक आणि डोळ्यांच्या
वेगळ्या ठेवणीमुळे आर्यन ठरविण्यात आले आहे. हे लोकं गाईचे दूध पीत नाहीत. त्यांच्या
टोप्यांमधे खोचलेल्या रंगीबेरंगी फुलांमुळे इतरांपेक्षा ते वेगळे आणि उठून दिसतात.
हान्लेला नदीकाठचा बराचसा दलदल
असलेला भाग आहे. त्यातून ब्लॅकनेक क्रेन आनंदाने फिरत होते. पक्षितज्ञ डॉ. सलीमअली
ह्या पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी बरेच दिवस येथे येऊन राहत असत. बेदी ब्रदर्सनी ह्या
पक्ष्यांच्या अभ्यासासाठी इथल्या हवामानाची आणि पर्यायानी उणे कितीऽऽही अंशांची पर्वा
न करता दोन वर्ष इथेच मुक्काम करून पक्ष्यांची पिले अंड्यातून बाहेर येण्यापासून त्यांच्या
सर्व सवयींचं यथासांग चित्रीकरण पूर्ण केलं. ह्या महाभागांनी केलेल्या ह्या ऋषितुल्य
तपश्चर्येमुळे आज आपल्याला लद्दाखच्या फक्त ब्लॅकनेक क्रेनच नव्हे तर व्हाईट स्नो लेपर्डस्
आणि इतरही वन्य जीवांविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.
चुशूल आणि चुमुरच्या
चीनसीमेनजिक मैदानासारख्या ओसाड जागांमधे युद्धाच्या वेळी पेरलेले भुईसुरुंग आजही सक्रिय आहेत. तिथे आजही
कोणीही जात नाही.
चीन-सीमेवर देमचोकला
गेलो असता तेथे पाळलेला याक छोटा कैलास ह्या जवळच असलेल्या पर्वतावर चरायला गेल्याचं
कळलं. हा छोटा कैलास म्हणजेही मोठ्या कैलासाचीच प्रतिकृती. इथून कैलास-मानससरोवरला
जायला सोपा आणि जवळचा सर्व ऋतुत चालणारा (all
weather road) रस्ताही आहे. भारताने
चीनसोबत हा रस्ता सुरू करण्यासाठी अनेकवेळा बोलणीही करून झाली. पण चीन मात्र इकडून
रस्ता सुरु करायला राजी नाही. (आता मात्र आपल्या
आदरणीय पंतप्रधान मोदीजींमुळे हिमाचलमधून सुगम असलेला रस्ता नुकताच सुरू झाला आहे.)
दूरूनच आमची गाडी येतांना पाहून खालच्या माणसांनी लदाखी भाषेत घातलेली हाळी निशब्द
शांतता चिरत सहज त्यांच्या पर्यंत जाऊन पोचली. एवढा मोठा डोंगर चढून गेलेला याक आणि त्याचा रायडर धावत पळत
15-20 मिनिटात डोंगर उतरून खाली आले. इतरवेळी शांतपणे चरत असलेल्या याकचं ते भर डोंगरावरून
असं धावत खाली येणं पाहून शंकराचा नंदी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हा याकच असावा असं
वाटायला लागलं. शंकररावही हिमालयातच राहणारे. कैलासावरून इकडे तिकडे हिंडायला बरा पडत
असेल असा एखादा नंदियाक!
इथल्या गाढवा-घोड्यांची वैरण असो अथवा वर्षाचा दाणागोटा!
ह्या लोकांना अतीशय सुरक्षित ठेवावा लागे. त्यातल्या त्यात थंडीमधे कियांगना मिळणारं
खुरटं गवत संपलं की ते झुंडींनी माणसांच्या वस्त्यांवर हल्ला करीत आणि अतिशय तकलादू
दरवाजे तोडून थेट आतील वैरण, अन्नधान्य सर्व काही फस्त करत. कियांग ही इथली जंगली खेचरं.
इतरवेळी माणसं पाहिली की गोंधळून जाणारे कियांग अशावेळी 4-5 माणसांच्या समूहालाही भारी
पडत. ह्या कियांगना तोंड देणं कठीण असे.
ह्या सर्व दुर्गम भागात
दगडामातीच्या घरांना रंग देणं हया अवघड गोष्टीला इथल्या लोकांनी छान पर्याय शोधले होते.
अनेकवेळा अनेक सामान पॅरॅशूट्सच्या साहाय्याने खाली टाकलं जाई. ह्या पॅरॅशूट्स्ची दणकट
पांढरी शुभ्र कापडं घराच्या भिंतींना आतून लावून भिंती सजविल्या जात. त्यावर एखादं
तारखांचं कॅलेंडर जरी कोणी लावलेल असलं तर आश्चर्याने थक्क व्हायला होई. निसर्गानी
माणसावर जेवढी जास्त बंधन घालावीत तेवढी सुखसाधनं माणूस आपल्या सोईसाठी निर्माण करतो.
बंदी तेवढी संधी! कोणाला भेटायला गेलं तर वीजच नाही तर बेल कुठून? पण दरवाजाबाहेर एक
दोरी लोंबत असे. ही दोरी थेट आतमधे बेडरूम पर्यंत जाई. तिथे टिन्ड फूडच्या एखाद्या
रिकाम्या डब्यामधे एका छोट्याशा दगडाला ती
बांधलेली असे. बाहेर दोरी ओढताच हा दगड रिकाम्या टिनच्या डबड्यात गडगडगड वाजून आतल्या
यजमानाला बाहेर पाहुणा आल्याची वर्दी देत असे. विजेवर चालणार्या मधुर, अति मधुर बेलच्या
आवाजानी ‘कोण आलं आहे आत्ता ह्यावेळेला’? असं कपाळावर आठ्या घालून येणार्या प्रश्नाऐवजी
‘बघा बघा बघा! कोणीतरी आलं आहे भेटायला’! असं मनापासून गडगडा हसून सांगणार्या त्या
दगडू घंटा जास्त आनंददायी होत्या.
लेमधे अनेक ठिकाणी गरम पाण्याची
उन्हेरी आहेत. जेवढी थंडी जास्त तेवढं हे पाणीही उकळतं! बोरॅक्सच्या उन्हेर्यांचं
पाणी पाईपमधून घरभर किंवा मेसभर फिरवून काही
ठिकाणी आर्मीच्या जवानांनी बुखारीलाही पर्याय शोधलेला असे. बाहेरची मैलोनमैल जमीन ह्या
बोरॅक्समुळे पांढरी आणि नापीक झालेली असे पण त्या अवघड आणि दुर्गम भूभागातही जवानांनी
अनेक कल्पक उपक्रम राबविलेले असत.
---------------------------
Comments
Post a Comment