36 डोंगर, रस्ते आणि खिंडी (ला)-

 

36 डोंगर, रस्ते आणि खिंडी (ला)-

                  रावणानी शिवतांडवस्तोत्रात पार्वतीचं वर्णन करतांना ‘अखर्वसर्वमंगला’ अशी पर्वतीची स्तुती केली आहे. ‘अखर्व’ म्हणजे जी बुटकी नाही ती! म्हणजे उंच! पार्वती ही बुटकी नसून चांगली उंच आहे. (असं माझं नाही रावणाचं म्हणणं आहे.) हिवाळ्यात बर्फाचं शंभर शंभर फुटांचं अमाप पीक घेणार्‍या लद्दाख मधील खिंडी आणि पार्वती एकाच हिमालयाच्या मुली ‘गिरिजा’ असल्याने आपल्या पार्वतीच्याच बहिणी होत्या. ‘चांगला बाबा’ असो, ‘खर्दुंगला’ असो ‘तगलाकला’ असो वा ‘झोजिला’. थोड्याफार उंचीनी त्या कमी जास्त असल्या तरी बहिणीच! त्यांच्या उंचीची तुलनाच होऊ शकत नाही. सगळ्याच अपर्णा !! एकाही हिरव्या सानुल्या पानाला स्पर्श सुद्धा न करणार्‍या! अनेक भूभागांना जोडून मानवावर उपकार करणार्‍या! कल्याणकारी असल्या तरी ‘भयचकित नमावे तुज रमणी’ अशाच! शरद् शिशिराचे सहा ते आठ महिने तपाला बसलेल्या ह्या गिरिकन्यांना डिवचलेलं मुळीच चालत नाही. तशी हिम्मतही कोणाकडे नाही. ह्या धवल हिमकन्या जरा जरी रागावल्या तर कोणाचे कोणाचे घास घेतील हे सांगताच येत नाही. त्यांच्या उघडलेल्या आक्राळविक्राळ दर्‍यारूपी तोंडामधे बालसुलभ वृत्तीने एखादा निर्झर बागडत जातांना दिसला तरी त्याच्या जोडीनेच अनेक जोंगा, टु-टनर, फायु टनर, ट्रकही त्यांनी गिळलेले दिसत. ह्या डोंगरांचा अजस्र आकार लक्षात घेता त्यांच्यावर स्क्रूच्या ग्रूव्हज् प्रमाणे गोलगोल प्रदक्षिणा घालणारे रस्ते काढणं ही कठीण!  हेअरपिनच्या आकाराची  वळणं घेत जाणारे हेअरपिन लूप किंवा हंगरु लूप हे इथल्या रस्त्यांचं वैशिष्ट्य! जुलै संपत आला की अनेक ठिकाणचं बर्फ वितळून झरे वहायला लागायचे. जुलैमधे झोझिला, खर्दुंगला, रोठंग ह्या गिरिकन्या थोड्या पाघळल्या की  मुंगळ्यांची रांग लागावी तसे फायु टनर टु टनर जोंगा अशा सैन्याच्या हिरव्या गाड्यांच्या  कॉनव्हॉय  ची रांग खिंडीमधुन सरपटु लागे. दूरदूरच्या ठिकाणी असलेल्या आर्मिपोस्टना वर्षभरासाठी रेशन, रॉकेल, डिझेल आणि इतर जीवनावश्यक गोष्टी पोचवणे ह्यासाठी ही लगबग असे. जेमतेम चार महिन्याचा थोडासा काळ आणि निसर्गाची सोंगं फार अशी स्थिती असे.  हे सामान  घेऊन धापा टाकत,  रस्ता चढतांना, मधेच दरड कोसळणे हिमपात, वाईट हवामान अशा  काही अडचणींमुळे ही रांग थांबली की एक मजेदार दृश्य दिसे. ट्रकच्या डिझेलच्या टाकीखाली शेकोटी पेटविली जाई. डिझेलला द्रवरूप ठेवण्यासाठी आणि पर्यायाने ट्रक पाहिजे तेंव्हा चालू करता यावा ह्यासाठी  ही सारी खटपट असे. बर्फ फार असेल तर बर्फावरून गाड्या घसरू नयेत म्हणून गाड्यांच्या चाकांवर लोखंडी साखळ्या बांधल्या जात. ह्या साखळ्या सतत प्रत्येक गाडीत ठेवलेल्याच असत.

               सह्यगिरीच्या काळ्या कातळाचा दणकट भक्कमपणाचा पोत मनाला कायम आश्वस्त करणारा. पाठीशी सतत खंबीरपणे उभा राहणारा. चढणार्‍या पावलाला आधार देणारा. हिमालयाच्याबाबतीत मात्र तसं नाही. हिमालयाचा पोतच वेगळा. अनेक आकाराचे  लहान, मोठे, प्रचंड दगड, गोटे, वाळू, माती अशा एकमेकांशी दूरान्वयाने नातं सांगणार्‍या गोष्टींचे कान एकमेकांच्या विरोधात नुसत्या वार्‍याने जरी भरले तर गगनाला भिडणारी ही प्रचंड रास कशी केंव्हा कोठे घरंगळेल, कोसळेल हे सांगताच येत नाही. कोसळली तर भूगोलाची सगळी समीकरणं बदलवून ‘दे माय धरणी ठाय’ हे प्रत्यक्षात अमलात आणणारी! असं म्हणतात शंकराच्या कृपेने रावणाला प्रचंड शक्ती प्राप्त झाली. पण ज्या क्षणी त्याला ही शक्ति प्राप्त झाली  त्याक्षणीच अहंकाराने तो उन्मत्त झाला आणि शंकराच्याच विनाशासाठी धावून गेला. अशा वेळी त्याच्या फट्फजितीचं वर्णन करतांना पुष्पदंत नावाचा गंर्धवांचा राजा शिवमहिम्नात म्हणतो-

अशा या लंकेशा कुठुन मनि दुर्बुद्धि सुचली

कृपेची ठेवी ना तिळभरहि जाणीव हृदयी।।

कृतघ्नाने त्याच्या   पसरुन पु र्‍या वीसहि भुजा

तुझे कैलासीचे घर हलविले रे गदगदा।।

परी गौरीशा तू हसुन सहजी दाबुन जरा

पदाच्या बोटाने तयि सुलभ पाताळ दिधला।।

(संस्कृत शिवमहिम्नाचे यथामति केलेले मराठी भाषांतर श्लोक- 12)

ह्या हिमगिरी रांगांतील डोंगराचा एखादा सुळका अचानक खाली येऊन पायाच्या अंगठ्याने मुंगी चिरडून टाकावी अशा सहजगत्या  कित्येक गाड्यांना, माणसांना आपल्या पायाच्या अंगठ्याने पाताळात गाडून टाकल्याच्या जागा आणि खुणा अनेक ठिकाणी दिसत राहतात.

                    इथली अंतरं मोजायची पद्धतही किलोमीटरमधे नसून तासात असे. एखादि जागा किती किलोमिटर दूर आहे ह्या विधानाला इथे फारसा अर्थ नाही. तिथे पोचायला किती तास लागतात हे महत्त्वाचं! गोष्टीतल्या सिंड्रेलाला रात्री बारा वाजेपर्यंत घरी पोचायलाच पाहिजे अशी अट होती. त्यानंतर तिचा सुंदर पोशाख, गाडी घोडा हे ऐश्वर्य लुप्त होत असे. लद्दाखमधल्या काही दुर्गम भागात दुपारी दोन ही शेवटची लिमिट होती. त्यानंतर तिथे हिमवादळांची सुरवात होत असे. अशावेळी गाडी, घोडा, हुद्दा ह्या रुबाबदार गोष्टींमधला कणा काढून घेतल्यागत त्या सर्व गोष्टी निराधार बापुडवाण्या होऊन जात. उंच पर्वतराजीत कित्येकवेळी सूर्यदेवांना सुद्धा प्रवेश मिळत नसे. ज्या हिमनद्यांवर दुपारचं ऊन पडत  नाही त्या हिमनद्या उन्हाळ्यात सुद्धा गोठलेल्याच राहून जात. त्यामुळे सकाळच्या उन्हापेक्षा दुपारच्या उन्हाचं महत्त्व फार! अशा खिंडी आणि अशा हिमनद्या दुपारी दोनच्या आत ओलांडलेल्या ब र्‍या.

                     रस्ता हा प्रकार ही कित्येक वेळा गौण प्रकारात मोडत असे. त्यातल्या त्यात हान्ले वगैरे प्रांतात जातांना  दहा वीस फुटबॉल ग्राऊंड्स सहज उलगडून टाकावीत अशी विस्तीर्ण सपाटी! आणि जोडीला स्मशानशांतता. खर सांगायचं तर स्मशानशांतता ह्या शब्दालाही शांतता सोडून गेल्याचा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. मुंबईत स्मशानसुद्धा सतत गजबजलेलच असतं. मुंबईत अनुभवी डॉक्टरही  सकाळी लवकर आटपून घ्या स्मशानात फार गर्दि असेल असा सल्ला देतात. इथे मात्र काळालाही शिरायला बहुधा परवानगी नसावी. अदृश्यपणे शंकर-पार्वती इथे सारीपाट खेळायला तर नाही बसले? एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर वेगळे रस्ते करायचीही फारशी जरुर नव्हती. कोणाला ओव्हरटेकही करायचं नव्हतं. आणि गाडी 25-50 फूट इकडून तिकडून गेली म्हणून कोणी ‘मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम हैं?’ म्हणून जाब ही विचारणार नव्हतं. पण नसलेल्या रस्यावरून जातांनाच भरकटायची फारच मोठी शक्यता असे. माउंटन गोट्स् च्या गळून पडलेल्या शिंगांचा म्हणजे अँटलर्सचा ढीग करून किंवा मेलेल्या याकची खोपडी ठेऊन  किंवा जमेल तर  दगडांना पांढरा रंग लावून रस्त्याची दिशा दाखवण्याचा प्रकारही सहृदय वाटे. कित्येक वेळा आमच्या ड्रायव्हर पलझोरला कोरड्याठाक पडलेल्या नदीच्या पात्रातूनच गाडी नेणं सोयिस्कर वाटे. चुकायची शक्यता कमी.

                               एकदा असाच एक किरकोळ ओढा ओलांडतांना ओढ्याच्या गारेगार पाण्याने गाडीचं इंजिन इतकं गार पडलं की गाडीने ओढ्यातच बसकण मारली. पायातले बूटमोजे भिजू नये म्हणून ( हो कारण ते आमचे life saver होते) ते काढून गाडीतून उतरेपर्यंत बघता बघता गाडीला अडून पाण्याची पातळीही वाढायला लागली. काही वेळातच पाण्याबरोबर गाडी पाण्यात सोडलेल्या नावेसारखी डोलायलाही लागली. गाडीत आणि गाडीच्या इंजिनमधे पाणी शिरायच्या आत बर्फाच्या पाण्यातून  धक्का देत तिला बाहेर काढणं हे मघाशी पाण्यातून अनवाणी चालत जाण्यापेक्षा ज्यास्त आवश्यक होतं. विना सेलफोन आणि विना गाडी आमच्या जीवाची गाडी कुठल्या नशिबाच्या खडकावर आपटली असती कोण जाणे. पण दैव हा आमचा पाचवा साथीदार आम्हाला कशासाठी तरी नितांत सांभाळत होता. काळजी घेत होता. प्रवाहातले दगड गोटे काढत ‘दे धक्का’ करत गाडीला बाहेर काढायचा आमचा प्रयत्नही निष्फळ ठरला होता. अशा ह्या निर्मनुष्य ठिकाणी सुदैवाने त्यादिवशी एक ट्रक आमच्याबरोबर होता. गाडीमधे एक भक्कम दोरही ठेवलेला असे. हा दोर कसाबसा गाडीला बांधून ट्रकला बांधण्यात आला. अशी ही ट्रकपॉवर लावण्यात आल्यावर म्हशीप्रमाणे ओढ्यात डुंबणार्‍या आमच्या अडेलतट्टु गाडीने नाखुशीनी ओढा सोडला.  पाण्यातून निथळत बाहेर आलेल्या त्या गाडीत धुगधुगी येऊन तिला पूर्वपदावर आणायला आम्हाला बरीच वाट पहावी लागली. अशी थांबायची वेळ आली की Have a break म्हणत कॅडबरी चॉकलेटने आमचा ब्रेक साजरा होत असे. आर्मी कँटिनमधे तेंव्हा 20 चॉकलेटस् असलेले कॅडबरीचे बॉक्सेस खूप स्वस्तात मिळत आणि सतत उपलब्ध असत. अर्थात लाडू, चिवडा आणि पोळी-भाजी ह्या सर्व गोष्टींना शोधलेला हा इथला पर्याय होता. दोन वर्ष मनसोक्त चॉकलेटस् खाल्यावर डाऊनला गेल्यावर कणादला कोणी चॉकलेट देऊ केलं तर ‘नको नको’ म्हणत त्याचा हात आपोआप मागे होई.

               बरोबर पलझोर आणि सोबत असलेल्या लोकांमुळेच आम्हाला ह्या संकटातून बाहेर पडणं शक्य झालं. नाहीतर एकाकी बेटावर अडकलेल्या सिंदबादसारखे डोक्याचे केस ओढून आणि छाती पिटूनही उपयोग होणार नव्हता. पण तारुण्य आणि फार विचार न करता मनाला पटलेली योग्य ती कृती पटकन करून मोकळे व्हा ह्या वृत्तीने कधी कधी तुम्ही मोठमोठ्या संकटांवरही हसत हसत विजय मिळवता.  त्या दिवशी त्या छोट्याशा ओढ्यात आमच्या गाडीलाही ओढून  पळवून न्यायची ताकद संचारली होती. असं माणसांना एकटं दुकटं गाठून त्यांची जराशी छेड काढून त्यांची भंबेरी उडवून देणारी ही निसर्गाची पोरं परत काहीच झालं नाही अशा आविर्भावात आम्हाला खळाळून हसत पुढे जात होती.

                         एकदा निमू ह्या लेजवळच असलेल्या घाटरस्त्यावर आमची गाडी बंद पडली. परत दैव हा आमचा मित्रपक्ष हाकेच्या अंतरावरच असावा. थोड्यावेळातच त्याने पाठवलेली क्रेन येऊन दाखल झाली. बहुधा आमची ही वरात पहायला आकाशात देवांनी दाटी केली असावी. त्यामुळे  टो केलेल्या गाडीने पुढचे दोन पाय उचलून देवाजीची करुणा भाकायला सुरवात केली आणि आम्ही पडत्या गाडीच्या आज्ञेने लोड तक्यांना टेकून झोपल्यागत पोझ देत ले पर्यंत बिना ‘डिजल’ प्रवास केला. वाटेत भेटणार्‍या गाड्याही आम्हाला हसून बाय बाय करायला विसरत नव्हत्या.

                      Top of Form

Bottom of Form

 रस्त्याच्या प्रत्येक वळणावर ‘ शिंदे मोड’, ‘फर्नांडिस मोड’ असे in the loving memory of  so and so चे इतके फलक होते की आपण प्रत्येक mode वरून न मोडता सुखरूप पुढे  आल्याबद्दल नमो नमः। नमो नमः॥ म्हटल्याशिवाय रहावत नसे. त्याच बरोबर कोण असेल हा तरुण? आपल्या परिवाराला सोडून हसत हसत सैन्यात दाखल झाला - - इथे आला - - तो- - त्याचा  - -परिवार - -कसा असेल?- - त्याच्या विना? मनात विचारांचं काहूर उठल्याशिवाय रहात नसे. कुठचीही खिंड ओलांडून जायची म्हणजे घरून निघतांनाच सोनम आणि दोर्जे गाडीत खतक म्हणजे पांढर्‍या रंगाचा एक स्कार्फ ठेवीत असत. खिंडीच्या अत्युच्च ठिकाणी हे खतक वाहून ह्या निसर्ग-कन्यांना धन्यवाद देत देत पुढे जाणं ही बळजबरी नव्हती; अपसूक मनापासून होणारी कृती होती. नास्तिकालाही नमवेल अशी दहशतच त्या खिंडींमधे होती. लेच्या दोन वर्षाच्या वास्तव्यात दोनदा तरी आपल्याही नावाचा फलक लागतो की काय अशी वेळ आली. काळाने आमची जऽऽरा गम्मत केली असावी. एक कृतज्ञ आयुष्य जगण्याची वाट, अहंकार उतरवून ठेवायची रीत दाखविली असावी.

                       त्यादिवशी तगलाकला ओलांडून जायची होती आम्हाला. पहाटे निघणं क्रमप्राप्तच होतं. दोनची लिमिट ओलांडून फारसं चालणार नव्हतं. पलझोर आला पण काहीतरी बिनसलं होतं. आदल्या दिवशीची सुट्टी आणि छांग जरा जास्तच झाली होती. छांग म्हणजे सत्तुपासून केलेली इथली लोकल बिअर किंवा व्होडका. जोंगा  चालवायला पलझोर बसला पण लक्षण काही ठीक दिसत नव्हतं. शेवटी त्याला मागे बसवून थोडी विश्रंती घ्यायला सांगितली. ह्यांनी ड्रायव्हरचा चार्ज घेतला. मी ड्रायव्हरच्या शेजारच्या पुढच्या सीटवर कणादला मांडीवर घेऊन बसले. घाटाच्या रस्त्याने वळणावळणाने गाडी पुढे जात होती. प्रत्येक हेअरपिन लूप वरून वर चढतांना उजवीकडची दरी अजून अजून खोल होत होती. उजवीकडे खोल - - अती खोल दरी आणि डावीकडे उंच पर्वत अशा पर्वताच्या नेपाळी गुरखा टोपीवरून मुंगी फिरावी तशी आमची गाडी सफाईदार वळणं घेत थेट तगलाकलाच्या माथ्यावर पोचली. गिरिजेला खतक वाहून घाट उतरायला गाडीने सुरवात केली आणि - - आणि  - -हे काय! उतारावरून गाडी सुसाट सुटली. पंप मारावा तसा प्रवीणचा पाय ब्रेकवर वर खाली वर खाली होत होता. काय झालं हे प्रत्येकाच्याच पटकन् लक्षात आलं. - - ब्रेक फेल !!! - - - माझं लक्ष प्रवीणच्या डोळ्यांकडे गेलं. पण अशाही स्थितीत चेहर्‍यावर डगमगलेपणा दिसत नव्हता. डोळे एकाग्रपणे परिस्थिती जाणून घेत होते. गिअरवर नियंत्रण ठेवत उजवीकडे दरीच्या दिशेनी जाणारी गाडी सुरक्षितपणे ह्यांनी डावीकडे डोंगरावर सावकाश धडकवली. पलझोरची छांग आत्तापावेतो उतरली होती. गाडी थांबताच त्याने गाडीतून उडी मारून तिथे पडलेला दगड पटकन् दरीकडे घसरणार्‍या गाडीच्या मागच्या चाकाखाली लावला. रोधून धरलेल्या श्वासांना मोकळीक मिळाली. विस्फारलेल्या डोळ्यांच्या पापण्यांनी थोडीशी हलचाल केली. इतकावेळ  मेंदूने एकही विचार मनात शिरू दिला नव्हता हे लक्षात आलं. शिवाच्या संहारकारी तांडवातील प्रथम अक्षर ‘ता’ आणि उमेच्या सृजनशील अशा लास्य नावाच्या नृत्यातील प्रथम अक्षर ‘ल’ घेऊन निर्माण होणाऱया जन्म-मृत्यूच्या ‘ताला’ वर निर्सगाने अक्षरशः काही सेकंद आम्हाला नाचवलं होतं. अजूनही कोणीही काहीही बोलायच्या मनस्थितीत नव्हतो. गाडीतून उतरून गाडीच्या पुढच्या भागाकडे धावलो. पण आश्चर्यकारकरीत्या गाडीला खरचटलंही नव्हतं. पलझोरनी गाडीचं बॉनेट उघडून तिची तपासणी सुरू केली. बाहेरच्या निसर्गाचं मौन आणि मनाचं मौन असा मौनाचा निर्विकार गुणाकार अजूनही सोबत सोडत नव्हता. गाडीतून उतरून एव्हाना आम्ही थोडंसं चालत पुढे आलो - - -प्रवीण,कणाद आणि मी - - - एका पुढच्याच वळणापर्यंत! - - - वळणावर असलेल्या पाटीचा आधार घेऊन खालच्या खोल दरीत डोकावतांना किती हजार फूट - - - हा विचार डोकावून गेला. पाटीवर अक्षरं होती - - - In loving memory of-  - - - -!

-------------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -