37 कारगील, द्रास, पानद्रास,गुमरी, झोझिला, अमरनाथ -
37 कारगील, द्रास, पानद्रास,गुमरी, झोझिला,
अमरनाथ -
सोनमर्ग
आणि कारगील ह्या दोन भूभागांना थंडीचे सहा,सात महिने एकमेकांपासून दूर करणारी तर 5
-6 महिने एकमेकांना जोडणारी अमरनाथ प्रिया झोझिला ही पर्वतकन्या अमरनाथ पर्वतरांगांमध्ये
निवास करते. ले कडून आलं तर कारगील, द्रास, पानद्रास, गुमरी अशी गावं भेटत जातात. आणि
नंतर झोझिला. द्रास, पानद्रास आणि गुमरी ही चढत्या भांजणीने जास्तजास्त थंड ठिकाणं.
गुमरी तर भारताचा उत्तर ध्रुव म्हणायला हरकत नाही. थंडीत इथे उणे 50 पर्यंत तापमान
खाली घसरतं. ह्या सर्व प्रदेशात प्रचंड हिमपात होतो. अगदी पन्नास ते शंभर फूट. अमरनाथचे
डोंगर आणि खंडाळ्याचा घाट यांची थोडीशी तुलना केली तर कोकण आणि देश खंडाळ्याच्या घाटानी
कसे वेगळे होतात तसं इथे काश्मीर व्हॅली आणि लद्दाख अमरनाथच्या पर्वतरांगांनी वेगवेगळे
होतात. सोनमर्ग,अमरनाथ, गुमरी, पानद्रास, द्रास इथपर्यंत प्रचंड हिमपात तर पुढे लद्दाख
परिक्षेत्र मात्र उपेक्षितच राहून जातं. थंडगार वाळवंट! गुमरी आणि झोझिला इथलं बर्फ
काढून आणि दरवर्षी रस्ता बनवणं हे महा कठीण काम लष्कराचे (B.R.O) border road organization चे जवान दरवर्षी न चुकता करत असतात. पन्नास ते शंभर फूट हिमात हरवलेला
रस्ता परत नव्याने तयार करणार्या जवानांना भगीरथापेक्षा कमी लेखणं अवघडच आहे.
गुमरीला आपले
लष्करी तळ असले तरी लोकवस्तीची गावं म्हणजे द्रास आणि पानद्रासच! द्रासला सुंदर गेस्टहाऊस
आहे. लाकडाचा मुबलक वापर करून बनविलेलं हे गेस्टहाऊस काश्मिरी कलाकुसरीनी नटलेलं दिसलं.
काश्मिरी सुबक गालिचे, सुरेख रंगसंगतीचं भरतकाम केलेले पडदे, अक्रोडाचं जाळीदार फर्निचर
ह्या सार्या गोष्टींवर काश्मीर व्हॅलीचं गडद प्रतिबिंब पडलेलं दिसलं.
घरंही लाकडाची
मात्र साधीच होती. तुफान बर्फ पडतो. 50 फूटसुद्धा. चुकून घराबाहेर आला तर घरावर पडलेल्या
बर्फाची घसरगुंडी करून घसरत घरात टपकावं लागत. थंडीचे 4-5-6 का 7 महिने आपल्या शेळ्या,
मेंढ्या, कोंबड्या ह्यांच्यासह सर्वांना एकत्रच
रहावं लागतं. एकाच घरात एकमेकांसोबत. हे असं स्वतला इतके महिने कोंडून रहायची कल्पनाच अस्वस्थ करणारी
होती. त्यावेळी हे लोक कशिदा काढणे,लोकर साफ करणे तिचा धागा काढून स्वेटर, शाली बनविणे
अशा अनेक कामात गुंतलेले असतात.
ह्याच गुमरीहुन पुढे बाल्तालकडून अमरनाथकडे
जायला रस्ता आहे. इथवर आल्यावर अमरनाथला जायची इच्छा आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती.
रात्रीही घोड्यावर बसून जाता येणार होतं. बरोबरचे पाहुणेही अमरनाथला जायला मिळणार म्हणुन
खूश होते. रात्री दहाला चालायला आम्ही सुरवात केली आणि थोड्या वेळातच जोरदार पावसाच्या
सरींनी आमचं स्वागत केलं. एखाद्या रंगत चाललेल्या सभेवर एखाद्या मोर्चाने दगडफेक करावी
तसे पावसामुळे डोंगरावरून सुटलेले दगडगोटे
गडगडत खाली यायला लागले. संगम पर्यंत नेटाने आम्ही गेलोही पण आता मात्र त्या संगम नावाच्या
ओढ्यानी रौद्र रूप धारण केलं होतं. घोडेवाल्याने सांगितलं - -“ साहेब पाण्यात घोडा
घालून पाहू! तो पलिकडे गेला तर आपल्याला पलिकडे जाता येईल.” घोड्याच्या लगामाची दोरी धरून चारपाचजण उभे होते. घोडाही पाण्याच्या वेगामुळे
वाहून जायला लागला तसा पाचसहा जणांनी दोरी खेचून त्याला पाण्याबाहेर काढला. आमच्या
बरोबर असलेल्या बाल आणि वृद्धांची काळजी घेणं आवश्यक होतं. आम्ही परत फिरलो. “पाऊस
थांबला की सकाळी जाऊ साहेब” घोडेवाला म्हणाला. आम्हालाही तसच वाटत होतं. पण ले ला राष्ट्रपती
येणार असल्याची बातमी आली आणि आता झालं येवढं पुरे झालं असा अमरनाथच्या शंकरबुवांनी
आम्हाला टेलिपथी संदेश पाठवला आणि त्याच दिवशी पॅक् अप् अँड् प्रोसीड् म्हणून लेला
परत पाठवून दिलं. सकाळी जाणारे मात्र जणू काही
काहीच घडलं नव्हतं इतक्या सहजपणे अमरनाथला जाऊनही आले. ‘ले का मौसम बंबई की फॅशन है
साब! - - -सुबह एक शाम को चेंज! ’- - लेला पाऊल ठेवताच तिथल्या स्थानिकानी सांगितलेलं
वाक्य डोळ्यापुढे चमकून गेलं. आता मात्र संगमला छानसा ब्रीज झाल्याचा फोटोही मी पेपरमधे
पाहिला.
पानद्रासकडून
भारत पाक सीमेवर जायच्या डोंगर-रस्त्यावर एक नाला आहे – बिंबट नाला! हा नाला भारत-पाक सीमा
रेषेवर असल्याने सिव्हिलियन्सना तेथे जायची परवानगी नाही. कधीकाळी तो भीमभट नाला म्हणून
ओळखला जायचा. भट ह्याचा अर्थ योद्धा ! ब्राह्मण,भटजी किंवा भिक्षुक नव्हे. असं म्हणतात,
पांडवांनी जेंव्हा आपल्या नातवाला - - परीक्षिताला राज्यावर बसवून आपला शेवटचा प्रवास
आरंभ केला आणि हिमालयाचा मार्ग धरला तेंव्हा भीम ह्या झर्यापाशी पडला. - - - तेथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या
नावावरून आजही त्याला बिम-बट किंवा बिंबत नाला म्हटलं जातं. ह्याच परिसरात द्रौपदी
कुंड ही आहे. अग्निज्वाले प्रमाणे जीवनभर जळत राहिलेली याज्ञसेनी द्रौपदी इथेच गिरिजेच्या अंकावर चिरनिद्रा
घेत पहुडली. कृष्णाला आपल्या पदराच्या चिंधीने कायम आपल्याजवळ बांधून ठेवणार्या द्रौपदीच्या
स्नेहाचे अथवा पांडवांच्या कीर्तीचे धागेही ज्याला बांधू शकले नाहीत त्या हिमाद्रीच्या
कुशीत बहुधा अमरनाथच्या वाटेवरच धर्मराजाला स्वर्गाचं द्वार उघडलं गेलं. पण धर्मराजाला
शेवटपर्यंत साथ करणार्या श्वानाला स्वर्गप्रवेश नाकारल्याने धर्मराजाने स्वर्गाकडेही पाठ फिरवली. अशी ही पांडवांच्या
प्राण-प्रयाण-महोत्सवाची कथा निसर्गाने मूकपणे सांभाळून ठेवली आहे.
------------------------
Comments
Post a Comment