41 प्रमोद-

 

41 प्रमोद-

                        बरेच दिवस लद्दाख मधे राहिल्यावर लक्षात आलं की आपण फक्त भौगोलिकरित्याच आपल्या माणसांपासून दुरावलो नाही तर अनेक घडून गेलेल्या चांगल्या वाईट घटना टिपकागदासारख्या हिमालयाने मधेच टिपून घेतलेल्या असत. x-ray department मधे किरणोत्सर्ग होऊ नये म्हणून केलेल्या led च्या भिंतींप्रमाणे आख्खा हिमालय डाऊनच्या सर्व घडामोडींमधे आणि आमच्यामधे अभेद्य भिंतीसारखा उभा होता.  घटनांचा ओलावा , त्यांच्यातल्या सुखदुःखाच्या छटा आमच्यापर्यंत न पोचता आम्ही तसेच निर्लेप राहून गेलो होतो. भारतात नवीन सरकारं येत होती. गडगडत होती. मंडल आयोगाची धुमश्चक्री चालू होती. राजीव गांधींची हत्या होऊन भारतभर त्याचे पडसाद उमटत होते. पण आमच्याकडे मात्र सारं काही शांत शांतच होतं. अगदी तिथल्या पर्वतराजीसारखे! 16 ऑगस्ट 91ला अचानक घरी फोन आला. “प्रमोद गेला”! एवढच बोलून प्रवीण पुढच्या कामाला लागला. विश्वासच न बसता गोंधळल्यासारखी मी प्रवीणच्या पुढे मागे फिरत होते. पण तो ऑफिसला जाईपर्यंत एकही अक्षर माझ्या तोंडातून बाहेर पडलं नाही. आणि त्यानेही सांगीतलं नाही. संध्याकाळी अचानक आलेल्या सर्वांबरोबर पार्टी पार्टी खेळतांना प्रवीणने  सहजपणे शेजारी बसलेल्या कर्नल मित्राला सांगितलं “आजच बारपेटाला माझ्या भावाला उल्फाच्या अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार मारलं. फोन आला होता तसा. सांगू नकोस कोणाला. विरस होईल सगळ्यांचा.” RSS ने प्रमोदवर आसामची जबाबदारी सोपवली होती. आपल्या वय्यक्तिक सुखांकडे पाठ फिरवून नलबाडीला शाळेत मुलांना शिकवण्याचं काम करत होता.16 ऑगस्टला RSS च्या ऑफिसच्या खोलीत “प्रमोद दीक्षित आहेत का?”असं विचारत अचानक काहीजणं आले. इतर स्वयंसेवकांसोबत असलेल्या प्रमोदने “हो मीच ! काय काम आहे आपलं?” अस्खलित आसामीत बोललेलं वाक्य पूर्ण व्हायच्या आत धाड धाड धाड सर्व रिव्हॉल्वर्स खाली झाली आणि प्रमोदचा निष्प्राण देह तिथेच खाली कोसळला. चांगल्या कामाला सुरवात असते, शेवट नसतो हे त्या अतिरेक्यांना कसं कळावं? देह आणि नावं मातीत विलीन झालं तरी परंपरा खंडित होत नाहीत.  भावनांचा सर्व कल्लोळ स्वतःच्या मनापुरताच मर्यादित ठेवत पुढची पार्टी  तेवढ्याच आनंदात कोणालाही काहीही न कळता पार पडली. आसामच्या नलबाडीला काश्मीरच्या लेमधून पोचायला तेंव्हा किती दिवस लागले असते माहीत नाही. इतक्या उशीरा पोचण्याचा उपयोगही नव्हता. माळेतून निखळून गेलेल्या त्या मोत्याला ‘श्रद्धया क्रियते तत् श्राद्धं’ (श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध )अशी मनातच श्रद्धांजली देऊन तो विषय हिमालयानी तिथेच संपवला. देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा। तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति।।  हे त्या हिमालयाने प्रत्यक्षात अमलात आणायला लावलं. पण कुठे तरी मनाने प्रश्न मात्र विचारला - - देहाला येणार्‍या कुमार, युवा आणि जरा म्हणजे वृद्धत्व त्यानंतर दुसर्‍या देहाची प्राप्ती ह्या गोष्टी क्रमशः घडतात तेंव्हा ठीक आहे पण मधे एक पायरी सुटली की मनाला ही गडगडत जायला होतच ना? स्वप्नवत् असलेले सहवास स्वप्न संपल्यासारखे संपून गेले. गीतेने दिलेली उत्तरं पचनी पडायला तयार नव्हती. पण खरी होती.

-------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -