43 सण आपले-तुपले - - - दिवाळी आणि बुद्धपौर्णिमा -

 

43 सण आपले-तुपले - - - दिवाळी आणि बुद्धपौर्णिमा -

                          आम्ही लेला गेल्यानंतर लगेचच आलेली दिवाळी बुखारी शेजारी आणि जाड जाड नवनवे कोट चढवूनच पार पडणार की काय असं वाटत होतं. बाहेरच्या उणे अंशानी  फटाक्यांनाही उणे करून टाकलं होतं. आणि फटाके उडवायची कोणाला खूप हौस असली तरी फटाके ह्या गोष्टीचं नावही बाजारात माहित नव्हतं. विमानाचा प्रवास फटाक्यांना सोसवणारा नव्हता. किंवा फटाक्यांचा विमानप्रवास विमानाला मान्य नव्हता. पणती लावणंही शक्य नव्हतं. बाहेर वाहणार्‍या बर्फाच्या तुफानी वार्‍यानी ‘ये कहानी है दिये की और तुफान की’ हे खर करून दाखवलं. पांढर्‍या बर्फावर पांढरी रांगोळी उठून दिसणार नव्हती. पोहे, रवा ह्या पदार्थांनी रजा घेतली होती. मी आनंदात होते मला दिवाळी साजरी करण्यापलिकडे काहीच करायचं नव्हतं. दिवाळी साजरी करायची म्हटलं की साजरी करायचीच हा उत्साह कोणी हिरावून घेऊ शकत नव्हतं. आमच्या मित्रांचं दिवाळीच्या पार्टीचं आमंत्रण होतंचं. पार्टी मेसमधेच साजरी होणार होती. आम्ही गेलो तर एअरफोर्स युनिट सुरु झाल्यापासून  मेस् पर्यंत दोन्ही बाजूंनी मशाली धडाडत होत्या. सुनसान प्रदेशातही उत्साहाचा एक रस्ता उजळून गेला होता. पार्टीचा मेनू काय होता याला महत्त्व नव्हतं आणि आजच्या घडीला मला आठवतही नाही. दिवाळीला सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी करणं हे महत्त्वाचं होतं. खरचं माणसाच्या स्वभावाच्या अनेक पैलूंनी मला थक्क करून टाकलं आहे. दिवाळीनंतर कितीतरी दिवसांनी महाडहून प्रवीणच्या मामींनी आठवणीनी पाठवलेलं पार्सल लेला येऊन दाखलं झालं होतं. त्यांचे फराळाचे पदार्थ,मसाले फारच रुचकर असत. “मामी मला काही तुमच्यासारखे पदार्थ बनवता येत नाहीत” अशी नुसती खंत व्यक्त करताच त्यांनी “तू जिथे असशील तिथे मी दिवाळीला तुला फराळाचे पदार्थ पाठवीन” असं आश्वासन दिलं होतं. त्यांचा प्रेमळपणा पाहून मला कितीही छान वाटलं असलं तरी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती इतक्या टोकापर्यंत अपेक्षित नव्हती. माणसं इतकं प्रेम का करतात ह्या प्रश्नाला उत्तर नाही. लेच्या हवेमधे प्रेमळपणाही विरळाच असल्यानी सर्व प्लॅस्टिकच्या पाकिटांचे फुगे आमच्यापर्यंत पोचण्याआधीच फुटले होते. आणि आमच्या आधीच मूषकरावांनी त्याचा बराचसा चट्टामट्टा केला होता. त्यानी बिघडत नव्हत. फराळ हे नुसतं निमित्त होतं.  नातलग मनानी भेटले होते. दिवाळी साजरी झाली होती. उंदरांना नक्की काय चविष्ट आणि सुंदर आहे हे कळलच नव्हतं. मामींनी सर्व सामानाबरोबर प्रेमाने पाठवलेलं पत्र जसच्या तसं आमच्या हातात होतं. बहुतेक सण कॅलेंडरवरच साजरे होत होते. वडाला सूत गुंडाळून आंबे वाटून साजर्‍या होणार्‍या वटपौर्णिमेच्या सणाचं वडाच्या अभावात लेच्या हवेशी सूत जुळत नव्हतं. ना नारळ ना समुद्र अशी नारळी पौर्णिमाही येऊन जात होती. आघाडा, दुर्वा, फुलांची चंगळ हरतालिकेला जमणार नव्हती. आटीव मसाला दूध भर ऑक्टोबर मधे चांदण्यात ठेऊन त्याची कुल्फी खायला लागली असती . अर्थात दूध मिळालं तर! अशावेळी गंगा गये गंगादास सिंधू गये सिंधूदास ही वृत्तीच योग्य होती. प्रत्येक ठिकाणी तिथले सण सोहळे पहाणे हाही एक हृद्य अनुभव असतो. संपूर्ण लडाखमधे बुद्धपौर्णिमा फार उत्साहात साजरी होत असे आणि आजही होते. आम्हीही उत्साहाने त्यात सामील झालो.

                आळंदीची दिंडी पंढरीला न्यावी ही ओढ वारकर्‍यांना लागावी तशीच चोखांगच्या गोंपेहून निघालेली बुद्धजयंतीची मिरवणूकक पाहून काहीसं वाटत होतं. आपल्याकडे नऊवारी साड्या, धोतर, मुंडाशी खांद्यावर पताका, डोईवर तुळशीमाय असं दृश्य असतं तर इथे सगळ्यांच्या अंगावर पारंपारिक लांब कोट गोंच्या, बायकांच्या डोक्यावर निळे निळे फिरोझा दगड लावलेल्या हत्तीचे कान असावे तशा  किंवा उंच उंच टोप्या, प्रत्येकाच्या हातात बुद्धाच्या मूर्ती, फोटो, किंवा धार्मिक पुस्तकं,लामांच्या लांबच लांब तुतार्‍या, झांजा, ढोल.

                    शाळेची मुलंही तेवढ्याच उत्साहाने आणि भक्तिभावाने सामिल झालेली. श्रद्धा या गोष्टीला पर्याय अजूनपर्यंत तरी माणसाला सापडला नाही. त्या सर्वश्रेष्ठ शक्तीला काहीही नाव मिळो पण तिला शरण जाणं, तिच्यापुढे नतमस्तक होणं जगभर मला सारखंच वाटलं. विधी वेगळे असले तरी अंतकरणापासून उमटणार्‍या भावना, भाव तेच! 

                       बुद्धजयंतीला लेजवळच्या चोखांगच्या गोंपेजवळ सकाळी हजारो बुद्धधर्मीय लडाखी गोळा होतात. त्यात जवळपासच्या खेड्यातून आलेली माणसं, स्त्रिया, शाळेचे विद्यार्थी, लामा सर्वजण असतात. चोखांगपासून निघणारी मिरवणूक संकर गोंपात काही काळ थांबते तिथे सर्वांना चहा नाश्ता दिला जातो.नंतर ती शांतिस्तुपाला येते. शांतिस्तूपावरून लॅमडान शाळेत सर्व जमा होतात. तिथून सर्वजण त्सेमो गोंपा चढून जातात. तिथे प्रार्थना होऊन तिथून सर्वजण लेमधल्या पोलो ग्राऊंडमधे जमा होतात. तिथे पारंपारीक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतात. संध्याकाळी घराच्याच मागे असलेल्या पहाडावर असंख्य मशालींची एक रांगच वर चढतांना दिसत होती.ही  शिस्तबद्ध मिरवणूक नंतर त्याच शिस्तीत खाली उतरत होती.

----------------------------

नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित)  अनुक्रमणिका

Comments

Popular posts from this blog

नाते लडाखशी

1 नाते लडाखशी (प्रस्तावना -)

2 लेहला बदली -