46 लेचा निरोप -
46 लेचा
निरोप -
बदली झाल्यावर
घर आणि ऑफिस सोडणं एवढ्या दुःखदायक गोष्टी नसतात पण आपल्या जीवाला जीव देणार्या या
परिवाराचा कायमचा निरोप घेणं ही कायमच गळ्यात आवंढा अडकायला लावणारी गोष्ट असते. पण
तरीही मागे वळूनही न पाहता पुढे जाणंच श्रेयस्कर असतं. कणादच्या शाळेतले मित्र कणाद
जाणार म्हणून दिवसभर घरीच रहायला आले होते. अनेक निरोप समारंभांनी लेशी आमचं नातं जास्तच
आत्मीयतेचं आणि दृढ होत होतं. रस्ता चालून जातांना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या
छायेत थांबावं तसं प्रत्येक बदलीच्या गावांच्या जागी आम्ही थांबत होतो. परत मागे न
बघता पुढे जात होतो. जो पर्यंत एखाद्या जागी रहावंसं वाटतं तो पर्यंतच तिथून पुढे जाण्यात
मजा असते. प्रवीणनी चार्ज दिला की शक्य तेवढ्या लवकर ते गाव आम्ही सोडत असू.
प्रवीणने त्याचा चार्ज दिला. भारतीय पोलीस सेवेनी 40 वर्षांच्या बोलीनं दिलेली,
आमच्या अंगणात कायमची अंथरलेली जादूची चटई, आम्हाला पंखांवरून बसवून दिल्लीला न्यायला सज्ज झाली. दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही विमानतळावर
जायला तयार असतांनाच अचानक ढगांनी गर्दी केली. हवा कुंद झाली. विमानं येण्याची सर्व
लक्षणं धूसर वाटायला लागली. विमानतळावर चौकशी केल्यावरही विमान उतरणं अशक्य असल्याचं
सांगण्यात आलं. आत्तापर्यंत लेराजांची खफा मर्जी अनुभवली नव्हती. जातांना आमची परीक्षा
घेणार की काय? नाईलाजानी घरच्या सोफ्यावर मट्कन् बसलो. भरलेल्या बॅगा परत सोडायला लागतील
ही कल्पनाही बरी वाटत नव्हती. आता ते घरही आमचं वाटत नव्हतं आणि घरातलं सामानही! परिवारातले
लोकं तेच होते. त्यांचं प्रेमपण तसंच होतं. फक्त ते आता आमचे नव्हते. औटघटकेचं माहेर बदलीबरोबर संपून गेलं होतं. परत
मागे वळून पाहिलं तर त्या राजवाड्याच्या जागी उरणार होत्या फक्त निर्जीव भिंती आणि
खुंटीला अडकवलेलं राजेपणाचं पागोटं! - - -
जे ती जागा सोडतांना तिथेच सोडून जायचं असतं.
एका अपरिचित वास्तूत
अजून किती दिवस रहायला लागणार कोण जाणे. एक दोन तास गेले आणि दोन डोंगरांमधून येणार्या
विमानाचा रस्ता अचानक स्वच्छ दिसायला लागला. मनावरचं मळभही दूर होऊन कुठेतरी आशेचा
किरण दिसायला लागला. लेमधे पहिला प्रवेश करतांना विमानातच कानावर आलेले शब्द पुन्हा
आठवले - “मॅडम, ले का मौसम बंबईकी
फॅशन! सुबह एक, शामको चेंज!” थोड्याच वेळात एअरपोर्टहून
फोन घणघणला चंडीगडहून निघालेलं विमान उतरत आहे. आम्ही आनंदाने भराभरा बॅगा उचलल्या.
सोनम, मोटुप, दोर्जे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. त्यांचे हात हातात घेऊन आणि
त्यांना जवळ घेऊन प्रवीण त्यांना धन्यवाद देत होता. कणाद हातात टी.सी फडकवत पुढल्या
शाळेसाठी आतुर होता. आम्हाला निरोप द्यायला दुतर्फा कितीतरीजणं हजर होते. प्रत्येकाला
हस्तांदोलन करत आम्ही पुढे चाललो होतो.
आयुष्याच्या पटात
लेच्या लोंकांच्या आठवणींचे मऊसूत पश्मिनाचे उबदार धागे किती घट्ट विणले गेले होते.
आज पंचवीस सव्वीस वर्षांनतरही मी हातात घेऊन
त्याचा पोत पाहतांना सारे चेहेरे मला कसे लख्ख दिसताएत. हसणारे मासोळी डोळ्याचे. त्यातच
लडाखच्या मुस्लीम असोसिएशनचे प्रमुख, अकबर लदाखी प्रवीणचे दोन्ही हात हातात घेऊन मोठ्या
प्रेमाने हस्तांदोलन करून निरोप देतांना त्याला म्हणत आहेत - ``our faith in Indian constitution has been restored seeing your performance Pravin. Wish you all the best!''
-------------------------------------------------------
नाते लडाखशी (अरुंधती प्रवीण दीक्षित) अनुक्रमणिका
Comments
Post a Comment