9 लेचे हवामान आणि गमतीजमती आणि पहिल्या हिवाळ्याची चुणुक -
9 लेचे हवामान आणि गमतीजमती आणि पहिल्या हिवाळ्याची चुणुक -
शास्त्रात शिकलेले अनेक सिद्धांत इथे प्रत्यक्ष अनुभवतांना मजा येत होती. हवेचे तापमान कमी करत गेले की हवेची बाष्प धारण करायची क्षमताही तेवढी कमी कमी होत जाते. आणि परिणामी थंडी बरोबर हवेचा कोरडेपणाही तीव्र व्हायला लागतो. कोरडेपणामुळे त्वचा इतकी फुटत असे की रक्त येऊ लागे. बरोबर नेलेल्या कोल्ड क्रीम्सनी इथल्या थंडीपुढे कधीच शरणागती पत्करली होती. ह्या अपायाचा उपायही ह्याच मातीत दडलेला होता. इथल्या थंडीत त्वचेला वाचवू शकेल असा रामबाण उपाय म्हणजे जर्दाळूच्या बियांचं म्हणजे गिरीचं तेल! ते सुद्धा कडव्या गिरीचं असेल तर त्वचेसाठी ज्यास्त चांगलं. हे तेल इथल्या कडक थंडीतही गोठत नाही. गोंपांमध्ये देवापुढे तर कित्येकवेळेला लडाखी घरामध्येही हे तेल दिव्यासाठी म्हणून वापरलं जायचं. त्यामुळे मला हमखास एका संस्कृत श्लोकाची आठवण येई.
अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरोभवति।
मलये भिल्लपुरन्ध्री चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते ॥
(अतिपरिचयाने एखाद्या चांगल्या गोष्टीचा किंवा गुणी माणसाचाही अपमान होतो. मलय पर्वतावर आदिवासी स्त्रिया चंदनाची लाकडं चुलीत सरपण म्हणून वापरतात.) लडाखमधे घरोघरी जळणारे जर्दाळुच्या बदाम-तेलाचे दिवे पाहून डाऊनच्या कोणाच्याही तोंडुन खालील उद्गार नक्कीच आले असते.
परिचय अतिरेकाने अपमान घडुन ये सहजी ।
जर्दाळु-तैल-दीपाने उजळे लडाख-रजनी ॥
पोस्टमन शेंगदाणा तेलाच्या भावात मिळणारं हे बहुगुणी तेल आम्ही दिल्ली,मुंबईला बाटल्या बाटल्या घेऊन आलो. पण कडक थंडी अभावी अंगावर रॅशच येऊ लागला. एका हवामानासाठी औषध दुसर्या हवामानात अपायकारक असू शकते. शेवटी `घी के दिये जलाये' म्हणणा र्या हिंदी बांधवाना, आम्ही रोज बदामाच्या तेलाचे दिवे लावतो म्हणून मी मनातल्या मनात तरी चिडवून घेतलं.
पोस्टमन तेलानेही मला लेला असच चकवलं. त्याचं कारणही तसंच होतं. पोस्टमनचा शेंगदाणा तेलाचा नवीन कॅन उघडल्यावर त्यातून तेलच बाहेर पडेना. शेवटी कॅन दाबून दाबून त्यातून गोठलेल्या तेलाच्या नळकांड्या बाहेर पडतांना पाहून हे डालडा मिश्रित भेसळयुक्त तेल असावे असं समजून मी कंपनीला तक्रार नोंदविणार होते. घराच्या बाहेर एक तापमापक टांगला होता. येता जाता त्यात पारा कुठेशी दिसतोय (परत चुकलेच! पारा नाही! पा र्याचा गोठणबिंदू उणे 38.83 से. असल्याने वेगळाच डाय अथवा इथॅनॉल)हे पहायचा चाळाच आम्हाला लागला होता. तापमापकात पाहिल्यावर मात्र त्याच्यात शून्याच्या वर कुठे पाराच दिसत नाहीए हे पाहिल्यावर, पहिल्यांदा उणे अंश म्हणजे काय ते कळलं. सप्टेंबरनंतरचा एकेक पुढचा दिवस आमच्यासाठी थंडीचा एक नवीन स्टँडर्ड नीचांक तयार करत होता. ऑक्टोबर मधेच शून्याखाली किती हे शोधायला लागत होतं. दिल्लीच्या तापमानापेक्षा इथलं तापमान साधारण किमान 10-12 अंशानी कमी असे आणि पुण्यापेक्षा 20-22 अंशानी.
आठच दिवसात बरोबर नेलेल्या सर्व पुस्तकांचे बाईंडिंग निघून खिळखिळी होण्याच्या मार्गावर पाहून cold dry desert चा अर्थ हळू हळू जाणवू लागला. कितीही गारवा असला तरी सकाळी सूर्यप्रकाशात ठेवलेली पालकची पानं असो नाही तर टोमॅटो! संध्याकाळपर्यंत वाळून कुरकुरीत होऊन जात. रस्त्याने जातांना शेताच्या काटेरी कुंपणाला टोचून वाळवत ठेवलेले टोमॅटो दिवसाभरात पूर्ण वाळून जात असावेत. त्यामुळे जून- सप्टेंबर ह्या छोट्याशा काळात उगवलेली फ्लॉवर,कोबी,मटार, टोमॅटो इत्यादि सर्व भाजी तर सफरचंद, जर्दाळू अशी सर्व फळंच नव्हे तर कच्चं मांसही उन्हामधे खळखळीत वाळवून ठेवायची इथली पद्धतच आहे.
वारणावतच्या लाखेच्या घरात रहायला जाण्यापूर्वी विदुराने धर्मराजाला एक प्रश्न विचारला होता.- ‘जंगलातल्या वणव्यात कुठला प्राणी जिवंत राहू शकतो?’ आणि धर्मराजानी सांगीतलं – ‘जमिनीखाली राहणारा.’ इथल्या उणे वीस च्या थंडीतही कोण तग धरू शकेल ह्याचं उत्तर ही बिळात राहणारा म्हणजे उंदीर आणि जमिनीखाली राहणारे कंद हेच होतं. ‘घरासमोरच असलेल्या गुलाब, हॉलिहॉक इत्यादि फुलझाडांना थोड्याच दिवसात जमिनीलगत कापून पोतं बांधून ठेवायला लागेल, नाहीतर उणे वीस अंशाला त्यातील पाणी गोठून झाडांच्या फांद्या फाटून जातील’ असं दोर्जेंनी सांगितलं होतं. हे सगळं विश्व, तेथील समस्या आणि त्यांची उत्तरं आम्हाला नवीनच होतं. ऑक्टोबरच्या सुरवातीलाच रस्त्याच्या बाजूला असलेल्या मृतप्राय दिसणार्या झाडांनाही एव्हाना पोती बांधून ठेवायला सुरवात झाली होती.
कोरडेपणासोबत असलेल्या अतीव थंडीमुळे crystlisation ही प्रक्रियाही वेगाने होत असल्याने अचानक टिच् आवाज होऊन फुटणारे ग्लास तर बघता बघता कुठल्याही कारणाशिवाय तडकणार्या बोनचायनाच्या प्लेट्स कुठली तरी जादूची फुंकर घातल्यागत बाय म्हणत निरोप घेत. आमच्याकडच्या काही क्रोकरीवर क्रॅक्सचं जाळंच तयार झालं. स्टीलचा पर्यायही त्याला पर्याप्त नव्हता. गाडीच्या दरवाजाची हँडल्स असोत अथवा कपाटाच्या दरवाज्याची हँडल्स् त्यांना उघड बंद करण्यासाठी हात लावताच त्या फ्रिजर मधून काढलेल्या बर्फाच्या पातेल्या प्रमाणे हाताला चिकटून बसत आणि हातातून वाहणारी गार कळ फूऽऽफू अशी फुंकर घालून विझवायला लागे. त्या निमित्ताने हात नाकावर चोळून आपलं नाकही जागेवर आहे ना असं वारंवार पहायचा चाळाच लागून गेला. गार पडणा र्या नाकाला टोपडं शिवणं अशक्य होतं. नाकातून रक्त येणे किंवा घोळणा फुटणे ह्या एखादेवेळी होणार्या नैमित्तिक क्रिया असल्या तरी त्यात घाबरण्यासरखं फारसं काही नाही असा डॉक्टरांनीच निर्वाळा दिला होता. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी चा वारंवार प्रत्यय येऊन कोणाला शेकहँड करायच्या आधीच किंवा कुठल्या वस्तूंजवळ हात अथवा अंग येताच चट् चट् आवाज होऊन बसलेल्या छोट्या छोट्या इलेक्ट्रिक शॉक्समुळे प्रतिक्षिप्त क्रियेने हात पटकन् मागे येई. घरात वॉल टु वॉल कार्पेटस् होतीच पण दरवाजांच्या मुठींवर लोकरी ची सुंदर आवेष्टनं होती. इतकच नव्हे तर कमोडच्या सीटवरही सीटच्या आकाराचं लोकरी वेष्टन विणलेलं होतं. थंडीत कमोडमधील पाणी गोठून कमोड फुटू नये म्हणून अती थंडीत रोज रात्री त्यात केरोसीन घालून ठेवायला लागे. इथले स्थानिक लोकं मात्र ड्राय टॉयलेटस्च वापरत.
शरीरातील अग्नितत्व टिकविण्यासाठी बुखारी हा इथला सोपा पण अत्यावश्यक शोध होता. थंडीमधे बहुतेक घरातील अॅक्टिव्हिटीज या बुखारीच्या परिसरात मर्यादित राहत. ह्या रॉकेलवर चालत असत. घराबाहेर जरा उंचावर केरोसीनचा जरीकेन ठेवलेला असे त्याला जोडलेल्या नळीतून थेंबथेंब रॉकेल बुखारीमधे पडून ते सतत जळत राही. त्याच्यामुळे ड्रम चांगला गरम होई. सर्व खोलीही गरम होई. बुखारीचा धूर बाहेर जायला फॉल्स सिलिंग गोलाकार कापून त्यातून धुराड्याची नळी बाहेर काढली होती. रोज एक माऊ सिलिंगवर धुराड्याशेजारी येऊन बसे. त्या गोलाकार छेद आणि धुराड्याच्या मधल्या फटीतून आपले पंजे खाली सोडून शेकत बसे. सर्वात शेवटी तिची शेपटीही गरम करून घेई. असं छतातून लोंबणारं शेपटीचं गुबगुबीत झुंबर फारच गमतीशीर दिसे. खालून ब्रेकफास्टच्या ऑम्लेटचा वास आल्यावर मात्र न राहून ती आख्खं डोकच खाली खुपसून वरतूनच आम्हाला विचारे – “म्याऊ! माझा ब्रेकफास्ट?” आणि टेबलावर चढून एक तुकडा आम्लेट वरती ठेवायला लागे.
थंडीत भाजीपाला सुस्थितित ठेवायची अभिनव कल्पना आमच्या टुंडुप कुक नी मला दाखवली . किचनमधे 3-4 गोदरेजची कपाट एका लाइनीत मांडून ठेवली होती. कुठलीही भाजी जाड फडक्यात पोत्यातच म्हणाना गुंडाळून गोदरेजच्या कपाटात ऊबेत ठेवायची. मी एवढी भाज्याची नाव घेतली म्हणजे वा वा ! इथे मुबलक भाज्या मिळतात असं नाही.एक पालकची गड्डी वा कोथींबीरीची चार पान किती अनमोल आहेत हे ले ला गेल्याशिवाय (दोन वर्ष राहिल्या शिवाय) नाही कळणार. इतरवेळी पाच-दहा रुपये फेकून मिळणारी कोथिंबीर मिरची आणि लिंबू 500रुपये देऊनही मिळणार नाही असं लक्षात आल्यावर कधीतरी मिळणाऱया कोथिंबिरीच्या चार काड्यांचा आनंद अवर्णनीय असाच असे. कोथिंबीरीचं मूळ सोडून सर्व भाग आम्ही उपयोगात आणत असू. मुंबईत पैसे फेकले की काहीही मिळत होतं आणि इथे कितीही पैसे टाकले तरी काहीही मिळणार नव्हतं. आम्ही अशा एका जगात जगत होतो जिथे निसर्गसम्राटाच्या आज्ञांचं पालन मुकाटपणे सर्वांना करायलाच लागत असे. कधी शाळेत (हो तोपर्यंत शाळेत शिकविण्याची एक छानशी संधी मला मिळाली होती त्याच्याबद्दल पुढे सांगेनच) माझ्या डब्यात पांढरी पोळी आणि भाजीवर कोथिंबीरीची दोन पान दिसली की व्वा-व! कोथिंबिर!!! म्हणून समोरच्याचे डोळे लकाकायचे. आणि “अरे व्वा! पाहुणे आलेले दिसताएत काय काय खाऊ आणलाय अजुन?”थोड्याच वेळात आमच्याकडे पाहुणे आले आहेत हा निरोप आमच्या सर्व मित्रमंडळींमधे पोचायचा आणि संध्याकाळी मस्त अंगत पंगत होई. तसेही आम्ही इतरांच्या मानानी खूप लकीच होतो कारण चंदिगडच्या ऑफिसमधे आम्ही पैसे पाठवून देत असू आणि तेही आम्हाला भाजी फळं, आटा,साबुदाणा अशा गोष्टी विमानमार्गे पाठवत असत. विमानाच्या पायलटसोबत हे सामान आमच्यापर्यंत येई. कारण विमानाच्या पायलट सोबत त्यांचे सलोख्याचे संबंध असत. आम्हाला मिळणार्या या सर्वोच्च सेवेमुळे थोड्याच दिवसात आम्ही आमचे मोफत मिळणारे आर्मि रेशन नको म्हणून कळवून दिले.
ह्या गोष्टीला मधे दोन दशकांहून अधिक काळ लोटला. आणि अचानक एक दिवस महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झालेला एक (IPS)अधिकारी आणि भारतीय प्रशासन सेवेत (IAS) असलेली त्याची लडाखी पत्नी कुंदन एका कार्यक्रमात भेटले. दीक्षित सरांचं नावं लडाखला अजूनही सर्वजण घेतात. हे तिने सांगतांच आम्हालाही बरं वाटलं. तिच्या एका नातेवाईकाने तिला सांगितलं की लडाखला राहूनही रेशन न घेणारा असा हा एकमेवच अॅफिसर होता. थोडक्यात रेशन नाकारणं हा तेथील लोकांच्या दृष्टीने फार मोठा त्याग होता. ते ऐकून आमचीही करमणूक झाली. परत मागच्या आठवणी जाग्या झाल्या. चंडिगडहून भाजीचा किंवा किराणा मालाचा बॉक्स आला की आम्हाला अवर्णनीय आनंद व्हायचा त्याचीही आठवण जागी झाली. त्या सर्व गोष्टी टिकविण्याची आमची धडपडही आठवली. दुधाच्या पातेल्याला स्कार्फ बांधून कपाटात ठेवायला लागत असे. नाहीतर सकाळी पातेल्यात दुधाची शंकराची पिंड तयार व्हायची. रात्री चुकून बाहेर राहिलेली पालकाची गड्डी सकाळी ऊठून पाहवं तर गोठून बर्फ झालेली असे. एकदा रात्रभर कपाटाबाहेर राहिलेल्या केळाला काळा उंदीर समजून मी ईईईईई--ई करुन ओरडले. इथल्या थंडीचा परिणाम इथल्या उंदरांवर मात्र मुळीच होत नसे. माणसांबरोबर त्यांच्या ऊबदार घरात तेही बागडत राहत.
इंद्राच्या दरबारात तकथै तकथै करुन नाचणार्यां अप्सरा आणि त्यांचा वाद्यवृंद कदाचित इंद्राला रिझवीत असेल. पण औरंगजेबाला ह्या गायन वादन नाचाची अंत्ययात्रा का काढाविशी वाटली असेल- -ह्याचं एक सुप्त कारण आम्ही झोपलो की मला सुचू लागे. आमच्या घराच्या फॉल्स सिलींगवर रात्रीचे नऊ वाजायची वाट बघत असे अनेक बॅले ग्रुपस् वाट बघत असत. एकदा दिवे गेले की सकाळपर्यंत हे स्टेज आपल्यालाच आंदण मिळालं आहे हेही त्यांना पक्क माहित झालं होतं. नऊ नंतर त्यांची साधना कोणी भंग करु शकेल हा प्रश्नच उद्भवत नसे. दिवे बंद झाल्या झाल्या सिलींग-स्टेजवर त्यांच्या नृत्य संगीताच्या आविष्काराला जोर चढे. मधेच मांजराचा रोल आला की नृत्याची आणि संगीताची धामधूम अजूनच वाढे. एकदा, मला गाढ झोप लागली असता ‘माझ्या डोक्यावर का कोणी हात ठेवला आहे?’ असं मला झोपेतल्या झोपेत वाटत असतांना, मेंदू मात्र ‘हा हात एवढा जड का’ असं वारंवार सुचवत होता. क्षणात माझी झोप उडाली आणि ईईईईईई उंदीर करत मी उठले. मेंदूने ऍनॅलिसिस पूर्ण करून मला ऍक्शनच घ्यायला लावली होती. जवळची विजेरी लावून बघेपर्यंत सारे जागे झाले होते. मी पलंगावर उभं राहून तांडव करत हेते. ‘माऊसासूर’ पळून गेला होता. उशीवर मात्र बदामाचं तेल लावलेला माझा केशसंभार विखुरला होता. पायाला काटा बोचल्यावर भर उन्हात तिथेच बसून मुळापासून ते काटेरी झुडुप उपटून टाकणार्या कौटिल्याची आठवण जागृत करत डाऊनहून उंदरांचं औषध मागवून थोड्याच दिवसात माझ्या ‘वेणीसंहारा’ची स्मृती जागवत आम्ही आमचा परिसर निर्उंदीर करून टाकला. पाकिस्तानी सैन्याशी मोठ्या हिमतीने लढून शौर्य पदक मिळविणाऱया ग्रुप कॅप्टन ह्या उच्च पदावर विराजमान झालेल्या आमच्या एका मित्रालाही रात्री झोपेत नेमकं नाकाच्या शेंड्याला चावून उंदरांकडून नाक कापून घ्यायची वेळ आली होती. डाऊनहून येणार्या धान्यासोबत हे उंदीरही लडाखमधे येऊन आता कायमचे स्थायिक झाले होते. त्यांना मात्र घटनेचे कलम 370 चा आदेश पाळायची सक्ती नव्हती.
बाळ जाते दूर देशा म्हणत आईने भाजण्या, पापड, गूळ, लाडू इत्यादि इत्यादि पदार्थ दिले होते. अतीव कोरड्या हवामानामुळे दोनच दिवसात त्याचे पापडतुकडा, गूळगोटा आणि लाडू पीठ तयार झाले. मोटुपला गुळ जरा फोडून देशील का विचारलं. थोड्यावेळानी एका बाटलीत भरलेली गुळाची वस्त्रगाळ पूड तो घेऊन आला. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधे सील करून आणलेल्या मसाला, भाजण्यांच्या पिशव्यांची पोटं फुटेपर्यंत फुगली होती, नाही तर फुटली होती. बाहेरच्या हवेचा दाब कमी तर पिशवीमधे असलेल्या थोड्याफार हवेचाही दाब बाहेरच्या दाबाच्या प्रमाणात खूपच जास्त असल्याने जर ह्या पिशव्यांवर एवढा परिणाम होत असेल तर शरीरावर काय होणार हे पहिल्या दिवशीच संध्याकाळपर्यंत जाणवायला लागलं होतं. डोकं फुटेल की काय अशी प्रचंड डोकेदुखी आणि मळमळ हे माझ्या आणि कणादच्या अति उत्साहाचं फळ होतं. घराच्या कोप र्यात शोभिवंत वस्तूप्रमाणे विराजमान झालेल्या ऑक्सिजन सिलेंडरची नळी नाकापुढे धरून जहांगीर किंवा नूरजहाँ प्रमाणे बिनवासाचा प्राणवायू हुंगतांना त्याचं प्राणवायू हे नाव किती सार्थ आहे हे कळून चुकलं.
पहिल्याच दिवशी मी ओले कपडे नित्य सवयीनी बाहेर वाळत घातले. लक्षात आलं तेव्हा सूर्य मावळून तास होऊन गेला होता. थंडीत बाहेर जायची हिम्मत होत नव्हती. सोनमला बाहेर वाळत घातलेले कपडे आत घेऊन ये म्हणून सांगितले. “जी!” म्हणून सोनम बाहेर गेला. आणि दोनच मिनिटात परत आला. “मेमसाब, वो कपडे अंदर नही आ रहे है।” म्हणून हातावर हात ठेवून उभा राहिला. मलाही हसू आलं. “अरे ते काय कुत्र आहे का मांजर आहे घरात यायला तयार नाही म्हणे? चल मी येते ” अस म्हणत मी सोनम बरोबर बाहेर आले बघते तो काय कपडे वाळणं तर राहो दूर त्याचं बर्फ जमून पाठ-पोट चिकटून बसले होते. कडक स्टार्च घालून वाळलेले कपडे बरे इतके ताठ झाले होते कसेतरी सोडवून त्याना घरात घ्यायचं तर त्या गोठलेल्या कडकडीत शर्टप्यांटांनी असे काही हात पाय पसरून ठेवले होते की त्यांना दरवाजातून आत आणता आणताच मारामार!
-------------------------------
Comments
Post a Comment